प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांचा बहुचर्चित चित्रपट ‘RRR’ च्या प्रदर्शनाची तारीख करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. अशातच आता प्रदर्शनाआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाच्या विरोधात तेलंगणा येथे पीआयएल अर्थात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यासोबत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणीही करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टॉलिवूड डॉट नेट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘RRR’च्या विरोधात ही जनहित याचिका तेलंगाणामधील पश्चिम गोदावरी येथे राहणाऱ्या एका विद्यार्थ्यानं दाखल केली आहे. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचं म्हणत या विद्यार्थ्यानं चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी आपल्या याचिकेत केली आहे. या चित्रपटात दोन स्वतंत्र सैनिक अल्लूरी सीता रामराजू आणि कोमाराम भीम यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचं या विद्यार्थ्यानं आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

चित्रपटाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या या विद्यार्थ्यानं आपल्या याचिकेत या चित्रपटाला सेन्सर सर्टिफिकेट दिलं जाऊ नये आणि प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. या चित्रपटात स्वतंत्र्य सैनिकांचा इतिहास बदलून किंवा मोडतोड करून दाखवण्यात आलं आहे. याप्रकरणी न्यायधीश उज्जवल भूयन आणि वैंकटे्शवर रेड्डी यांनी सुनावणी केली. आता पुढील सुनावणीची प्रतिक्षा आहे. दरम्यान याबाबत दिग्दर्शक राजामौली किंवा त्यांच्या टीमकडून कोणत्याही प्रकरची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

‘RRR’ मध्ये ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण तेजा यांनी अल्लूरी सीता रामराजू आणि कोमाराम भीम या दोन स्वतंत्र्य सैनिकांच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट सुरुवातीला ७ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता मात्र देशभरात करोना रुग्णाची संख्या झपाट्यानं वाढल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rrr controversy pil filed against film and director ss rajamauli in telangana mrj