बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातून सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जात आहे. येत्या ३ जून २०२२ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेता सोनू सूदही भूमिका साकारत आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. नुकतंच सोनू सूदने दाक्षिणात्य विरुद्ध हिंदी चित्रपट या मुद्द्यावर भाष्य केले. "एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटात काम करणं हे मला वाईट हिंदी चित्रपटात काम करण्यापासून वाचवते", असे सोनू सूद म्हणाला. सोनू सूदने नुकतंच इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत सोनू सूदने दाक्षिणात्य चित्रपट, हिंदी सिनेसृष्टी याबद्दल वक्तव्य केले. तो म्हणाला, "मी नेहमीच ठराविक चित्रपटच करतो. मग तो तामिळ असो, तेलुगू असो किंवा हिंदी. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी मला वाईट हिंदी चित्रपट करण्यापासून वाचवले आहे. नाहीतर कधी कधी कलाकारावर अशी वेळ येते की तुम्ही फक्त एका मोठ्या चित्रपटात असण्यासाठी तो चित्रपट करत असता. पण दाक्षिणात्य चित्रपटांनी मला यापासून दूर राहण्यास मदत केली आहे." "ते सर्वोच्च आहेत की नाही मला माहिती नाही. पण मी स्वत:ला फार भाग्यवान समजतो. मला चित्रपट करणे, १००-२०० कोटींच्या चित्रपटात काम करावे, असे मलाही वाटायचे. याला यश म्हणतात. पण सामान्य माणसाशी जोडणे, गरजूंना मदत करणे हा माझ्यासाठी सर्वात समाधानकारक अनुभव आहे. मी याचा सर्वाधिक आनंद घेत आहे", असे सोनू सूद म्हणाला. दरम्यान सोनू सूद हा नुकताच 'आचार्य' या तेलुगू चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात चिरंजीवी आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. यानंतर आता तो 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आधी 'पृथ्वीराज' असे होते. करणी सेनेच्या आक्षेपानंतर यशराज फिल्म्सने चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसत आहे. यात पृथ्वीराज चौहान यांनी शौर्याने युद्धे कशी जिंकली आणि दिल्लीची सुल्तानी कशी मिळवली हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यातील लढाईचे दृश्यही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाद्वारे २०१७ ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिनेता संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा आणि मानव वीज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे.