Aman Verma Vandana Lalwani Divorce : अभिनयविश्वात एकीकडे कलाकारांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत, तर दुसरीकडे काही जोडपी घटस्फोट घेत आहेत. नुकताच क्रिकेटपटू युजवेंद्र चहल व धनश्री यांचा घटस्फोट झाला. बॉलीवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा ३७ वर्षांनी विभक्त होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. याचदरम्यान आणखी एक अभिनेत्याचा ९ वर्षांचा संसार मोडलाय, अशी माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बागबान’ फेम अमन वर्मा आणि त्याची पत्नी वंदना लालवानी यांच्या नात्यात दुरावा आला आहे, अशी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या ९ वर्षांनंतर अमन वर्मा आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेत आहे. अभिनेत्याला याबद्दल विचारण्यात आल्यावर त्याचे वकील याबद्दल बोलतील, असं तो म्हणाला. नेमकं काय घडलंय, ते जाणून घेऊयात.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अमन व वंदना जोडप्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं की दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून मतभेद आहेत. त्यांनी त्यांचं नातं सुधारण्याचे खूप प्रयत्नही केले आहेत. पण तरीही काही सुधारणा झालेली नाही, त्यामुळे ते दोघेही आता वेगळे होत आहेत. “अमन वर्मा आणि वंदना लालवानी यांनी बाळाचा विचार केला होता आणि दोघांनीही त्यांचं नातं सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु त्यांच्यातील दुरावा इतका वाढला की शेवटी या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला,” असं सूत्रांनी सांगितलं.

अमन वर्मा घटस्फोटाबद्दल काय म्हणाला?

५३ वर्षीय अमन वर्माच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं म्हटलं जात आहे. घटस्फोटाच्या वृत्तावर आता अमन वर्माची प्रतिक्रियाही समोर आली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अमनला या विषयावर विचारण्यात आल्यावर तो म्हणाला, “मी सध्या कोणतीही टिप्पणी करणार नाही. मला जे काही बोलायचं असेल ते योग्य वेळी माझ्या वकिलामार्फत सर्वांना कळवलं जाईल.”

लग्नाला झाली ९ वर्षे

अमन वर्मा आणि वंदना लालवानी यांची भेट २०१४ मध्ये ‘हमने ली शपथ’ या शोदरम्यान झाली आणि त्यांच्यातील जवळीक वाढली. जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये दोघांनी लग्न केले. अमन पत्नीचे खूप कौतुक करायचा. अशातच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याने या दोघांमध्ये नेमकं कशामुळे बिनसलं, याबाबत चर्चा होत आहे. अमनपेक्षा वंदना १४ वर्षांनी लहान आहे.

दरम्यान, अमनने एका मुलाखतीत सांगितलं होतं की लग्नामुळे तो एक माणूस म्हणून खूप बदलला आहे. “मी खूप शांत झालो आहे आणि अग्रेशनही बरेच कमी झाले आहे. लग्न हा माझ्यासाठी एक मोठा टप्पा आहे, कारण मी बरीच वर्षे एकटा राहिलो आहे. कारण जेव्हा योग्य जोडीदार मिळेल तेव्हाच लग्न करायचं, असं मी ठरवलं होतं,” असं अमन लग्नाबद्दल बोलताना म्हणाला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baghban actor aman verma vandana lalwani divorce after 9 years of marriage hrc