‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिकेने आजवर सगळ्यांना खळखळवून हसवत, सर्वांचं मनोरंजन करत आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. कुशल हा उत्तम अभिनेता तर आहेच, शिवाय तो उत्तम लेखकही आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची अनोखी लिखाणशैली प्रेक्षकांसमोर मांडत असतो.
अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कुशलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाद्वारे तो आपल्या चाहत्यांबरोबर त्याच्या आयुष्यातील अनेक गंमतीजमती शेअर करत असतो. सोशल मीडियावरील त्याच्या लिखाणाचं अनेकांकडून कौतुक केलं जातं. अभिनेता स्वत:बद्दलचे काही फोटो व व्हिडीओ शेअर करण्याबरोबरच त्याच्या पत्नीबद्दलही अनेकदा व्यक्त होत असतो.
कुशल आणि सुनयना यांचा प्रेमविवाह झाला आहे. पण त्यांच्यात नवरा-बायकोपेक्षा जास्त मित्र-मैत्रीणीचं नातं पाहायला मिळतं. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. अशातच त्याने पत्नी सुनयनाचे फोटो शेअर करत त्याखाली मजेशीर कॅप्शनही लिहिलं आहे. त्याने लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. या पोस्टमधून त्याने परदेशात असलेल्या पत्नीसाठी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टमध्ये कुशल म्हणतो, “अचानक एक दिवस फोन करून माझी बायको मला म्हणते, या देशात लोक खूप भावूक आहेत. आम्हाला इथे प्रभू श्रीराम आणि ‘माता सीता’ म्हणून आमची पूजा केली. जवळजवळ गेला महिनाभर माझी बायको तिच्या कथ्थकच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परदेशात त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये आहे. त्यात ती ‘सीता मातेची’ भूमिका करते.”
यानंतर त्याने असं म्हटलं, “मी तिला म्हणालो की, अगं… ती सीता प्रभू रामांबरोबर कितीतरी वर्षं जंगलात चालत राहिली. आपण डोंबिवलीला असताना, मी ‘तुला’ २–३ वेळा डोंबिवली स्टेशन ते घर चालत नेलं होतं, तर आजसुद्धा भांडणात तो मुद्दा घेऊन येतेस आणि ‘माता सीता’ म्हणून तुम्हाला पूजल्याचं कौतुक मला सांगतेस. त्यानंतर फोनवरच आमच्यात थोडंसं रामायण घडलं.”
यापुढे त्याने असं म्हटलं, “अर्थात माझा पराभव झाला. माता सीतेपुढे दशानन रावण हरला. तिथे आपली काय बिशाद! असो पण आता ये घरी परत. खऱ्या आयुष्यात आपण ‘राम-सीता’ नसलो तरी ‘तू’ सोबत नसताना आयुष्य म्हणजे वनवासच गं…” कुशलची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून मानसी नाईक आणि नम्रता संभेरावसारख्या कलाकारांनी या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.