Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सिद्धूने देवीच्या उत्सवात गुपचूप भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं. पण, हे सत्य अद्याप कोणालाच माहिती नाहीये. दळवी कुटुंबातील प्रत्येकजण भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत असतो. दुसरीकडे, सिद्धूला सुद्धा भावनाला सगळं सत्य सांगायचं असतं. पण, अनेकदा प्रयत्न करूनही त्याला ते शक्य होत नाही. अखेर ज्या क्षणाची एवढे दिवस सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण मालिकेत लवकरच येणार आहे.

सिद्धू भरसभेत भावनाशी लग्न झाल्याचं जाहीर करणार आहे. आता सिद्धू सर्वांसमोर भावनाचा स्वीकार कसा करणार? या लग्नाला संपतराव गाडेपाटील मान्यता देणार का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत संतोष श्रीनिवासला म्हणतो, “भावनाच्या गळ्यात एका मुलाने मंगळसूत्र बांधलं आणि तुम्ही काहीच करू शकला नाहीत.” मोठ्या मुलाचं अशाप्रकारचं तिरसट वागणं पाहून श्रीनिवास हतबल होतात आणि आपल्या मुलीसाठी गाडेपाटलांच्या घरी मदत मागण्यासाठी जायचं या विचारात असतात.

तर, दुसरीकडे गाडेपाटलांच्या घरी इनकम टॅक्सची धाड पडते. यावेळी भावना त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहते आणि संपूर्ण परिस्थिती हाताळते. यादरम्यान सिध्दूचा लॅपटॉप जप्त होतो आणि पासवर्ड विचारल्यावर, तो गोंधळतो. कारण, त्या लॅपटॉपचा पासवर्ड ‘भावना’ असा असतो. इकडे प्रचार सभास्थळी, सिंचना रेणुकाला भावनाच्या गळ्यातील मंगळसूत्राबद्दल सांगते. भावनाचा भरसभेत अपमान होतो आणि ती सभास्थळातून बाहेर निघून जाते. लक्ष्मी तिची समजूत काढते आणि तिला अभिमानाने, धैर्याने लोकांना सामोरं जाण्याची प्रेरणा देते.

एवढ्यात वेंकी सिध्दूला इशारा देतो, “हीच तुझी संधी आहे, आता भावनाशी झालेलं लग्न जाहीर कर” एवढ्यात सभा सुरू होते आणि श्रीनिवासच्या भाषणादरम्यान गोंधळ होतो. पाटलांच्या उमेदवारीवर देखील प्रश्न उपस्थित केले जातात. जनतेला शांत करण्यासाठी सिध्दू मंचावर जाऊन मी तुमच्या मतदारसंघाचा जावई असल्याचं सांगतो आणि थेट गर्दीत जाऊन भावनाचा हात धरतो आणि “हीच माझी पत्नी…” असल्याचं जाहीर करतो.

स्टेजवर संपतराव लग्नाला मान्यता देतात आणि गुणाजींची सार्वजनिक माफीही मागतात. गुणाजींचा पाठिंबा असूनही, संपतरावांच्या मनात भीती आहे की या सर्व प्रकारामुळे त्यांचं राजकारण संपेल. इकडे संतोष गाडेपाटलांच्या कुटुंबाकडून भरपाई मागण्याचा विचारात आहे. सिध्दू लक्ष्मीच्या घराबाहेर उभा राहतो आणि ठामपणे म्हणतो “मी इथून जाणार नाही, जोवर भावनाला माझ्याबरोबर नेत नाही.”

आता सिद्धू, भावनाला आपल्या घरी घेऊन जाऊ शकेल का? लक्ष्मी- श्रीनिवास, सिद्धूचा जावई म्हणून स्वीकार करतील का? भावनांच्या मनात काय सुरु आहे, हे सिद्धूला कळेल का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा लवकरच ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत होणार आहे.