Marathi Actor Vijay Patwardhan’s Post : ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २०१८ ते ऑक्टोबर २०२० या काळात प्रसारित केली जायची. या मालिकेत लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानिस यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

मात्र, काही वर्षांपूर्वी शशांक, मृणाल, शर्मिष्ठा राऊत यांसारख्या कलाकारांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळींकडे थकवलेले पैसे परत देण्याची मागणी केली होती. या सगळ्या विरोधात कलाकारांनी सोशल मीडियावर भाष्य केलं होतं. यानंतर काही कलाकारांना त्यांचं मानधन देण्यात आलं मात्र, आजही अनेकांचे पैसे परत मिळालेले नाहीयेत.

लोकप्रिय अभिनेते विजय पटवर्धन यांनी सविस्तर पोस्ट शेअर करत याबाबत खंत व्यक्त केली आहे. मंदारचा आदर करत असल्याने इतके दिवस शांत होतो पण, आता डोक्यावरून पाणी जातंय म्हणून ही पोस्ट लिहितोय असं विजय पटवर्धन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अभिनेते विजय पटवर्धन यांची पोस्ट

सुखाच्या सरींनी हे मन बावरे!!!
ही लोकप्रिय मालिका बंद होऊन, आता जवळपास पाच ते सहा वर्षे झाली. पण, माझ्या कामाचे पैसे अजूनही मिळाले नाही आहेत. इतकी वर्षे वाट पाहून आता नाईलाजाने मला व्यक्त व्हावं लागत आहे.
मी मंदार देवस्थळी, यांच्या टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन निर्मित ‘हे मन बावरे’ या मालिकेत, नायिकेच्या म्हणजेच मृणाल दुसानिस हिच्या भावाची, “सुनीलची” भूमिका केली. चित्रीकरणाच्या दरम्यान वेळ काळ न बघता, प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जीव तोडून काम केलं. पुण्यात असताना तातडीने शूटिंगला बोलावल्यावर लगेच मुंबईला गेलो आहे. कोविड काळातही बंधने शिथिल झाल्यावर मालिकेत काम केलं. मालिका संपल्यानंतर या मालिकेचा एक पैसाही मला मिळालेला नाही. पॅकअपच्या वेळेला मला काही रकमेचा जवळपास ३ लाखांचा चेक देण्यात आला होता. पण तो भरल्यावर बाऊन्स झाला. त्याबद्दल विचारणा केली तेव्हा एका आठवड्यात फोन करतो असं सांगण्यात आलं. पण आजतागायत फोन आला नाही.

एक उत्तम दिग्दर्शक आणि मित्र असल्यामुळे माझ्यासकट बऱ्याच जणांनी कोणतीही तक्रार केली नाही किंवा कुठेही वाच्यता केली नाही. पण आता पाणी डोक्यावरून जायला लागल्याने हे लिहावं लागलं. बायकोच्या कॅन्सर ट्रीटमेंटसाठी पैसे हवे होते त्यासाठी फोन केला, तो पण उचलण्यात आला नाही.

काही कलाकारांना त्यांचं पेमेंट मिळालं पण काहींना मिळालं नाही. अनेक वेळेला फोन केला पण उचलला गेला नाही. प्रत्यक्ष भेट झाल्यावरही काही विषयही काढला गेला नाही. आम्ही प्रत्येक वेळी समजून घेतलं, नेहमीच सपोर्ट केला, पण आम्हाला फक्त तारखा आणि आश्वासनं मिळत गेली. मंदार खूप उत्तम दिग्दर्शक आहे. त्याच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेम आहे आणि राहीलही. म्हणूनच इतके दिवस गप्पं होतो. पण आता त्याच गोष्टींचा विचार करून खूप मानसिक त्रास होतोय. मंदार, हे सगळं इथे शेअर करतोय, कारण इतके दिवस मी तुझ्या अडचणी समजून घेतल्या. पण, आता माझ्याही काही अडचणी आहेत. ज्यातून मार्ग काढणं अवघड जातं आहे. माझ्या अडचणी तू समजून घ्याव्यास. एकदा माझ्या बाजूनेही विचार कर.

मला कुणालाही दोष द्यायचा नाहीये. पण इतकी वर्ष वाट पाहूनही न्याय/पैसे न मिळणं कोणासाठीही खूप त्रासदायक आहे.
आणि या सगळ्यांत माझं काय चुकलं? तू ज्या अडचणीत आहेस अशी वेळ कुणावरही कधीच येऊ नये. लवकरच तू याच्यातून बाहेर पडावं…माझ्यासारखे अनेक लोकांचे पैसे अडकले आहेत, ते लवकर मिळावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.

मंदार, तू लवकर या सगळ्यांतून बाहेर पडावं आणि पुन्हा पहिल्यासारखं जोमाने आणि जबरदस्त काम करावं हीच सदिच्छा..धन्यवाद…
(तुझ्याबद्दलचा आदर म्हणून इतके दिवस कधी बोललो नाही. पण, आज मला व्यक्त व्हावंसं वाटलं. चूकभूल माफ. मला लाईक्स आणि सहानुभूती मिळावी म्हणून मी हे लिहिलं नाहीये. ज्यांना असा अनुभव आला आहे, त्यांना माझं म्हणणं आणि माझी अडचण कळेल)

दरम्यान, विजय पटवर्धन यांच्या पोस्टवर शशांक केतकरने केली कमेंट करत त्यांना पाठिंबा दिला आहे. याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी देखल विजय यांनी लिहिलेल्या पोस्टला समर्थन दिलं आहे.