अलीकडच्या काळातील सगळ्या कलाकारांना सोशल मीडियावर सक्रिय राहावं लागतं. आपलं काम सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं तसेच कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कलाकार विविध समाजमाध्यमांचा वापर करतात. पण, या सोशल मीडियाचे जसे चांगले परिणाम आहेत तशीच वाईट बाजूही आहे. गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींना डीपफेक किंवा मॉर्फ केलेल्या खोट्या व्हिडीओंमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचं पाहायला मिळालं आहे. याचा फटका रश्मिका मंदाना, विद्या बालनसारख्या बॉलीवूडच्या बड्या अभिनेत्रींना सुद्धा बसला आहे. याबाबत नुकतंच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने सुद्धा आपलं मत मांडलं आहे.
अभिनेत्री मीरा जगन्नाथने नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’च्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी जयंतीने तिला रॅपिड फायर राऊंडमध्ये “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे तुझं काय मागणं असेल?” असा प्रश्न विचारला. यावर मीरा जगन्नाथ म्हणाली, “सध्या अनेक साइट्स सुरू करण्यात आल्या आहेत, ज्यावर खूप घाणेरडे प्रकार चालतात. त्या बंद केल्या पाहिजेत. या साइट्सवर अनेक अभिनेत्रींचे फोटो, काही OOPS Moments किंवा एखाद्या चित्रपटातील सीन टाकून त्याच्यावर घाणेरडा मजकूर लिहिलेला असतो. त्यामुळे मला असं वाटतं की, चित्रपट प्रदर्शित करताना तुम्ही सेन्सॉरचे निर्बंध घालता तशीच बंधनं या सगळ्या वेबसाइट्सबाबत घातली गेली पाहिजेत.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “कोणत्याही साइट्सवर अभिनेत्रींचे किंवा कोणत्याही महिलांचे हे असे व्हिडीओ टाकणं, त्यावर घाणेरड्या कमेंट्स लिहून ते शेअर करणं हे अत्यंत चुकीचं आहे. मध्यंतरी माझ्या एका जवळच्या व्यक्तीने याचा स्क्रीनशॉट काढून मला पाठवला होता. मला असं वाटलं की, वेबसीरिजचा सीन इथे का शेअर केलाय? तो सीन नॉर्मल आहे. पण, त्यावर AI वगैरे वापरून जे काही केलं जातं ते खूप भयंकर होतं.”
“इन्स्टाग्रामपेक्षा या वेबसाइट्स खूप जास्त घाणेरड्या आहेत. हे बंद झालंच पाहिजे. या वेबसाइट्स बाहेरच्या देशातून वापरल्या जातात आणि कसेही व्हिडीओ मॉर्फ करून त्याचा गैरवापर केला जातो. यावर लगाम घातला पाहिजे. आता इन्स्टाग्रामवर एक फिचर आहे की, आपल्याला एखादा शब्द आपल्या कमेंट्समध्ये नकोय, तर तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन त्यात बदल करून, तुम्ही आपल्या फॉलोअर्सना निर्बंध घालू शकता. मी ते सगळं करून घेतलंय” असं मीराने यावेळी सांगितलं.
दरम्यान, मीरा जगन्नाथबद्दल सांगायचं झालं, तर ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वामुळे सर्वत्र चर्चेत आली होती. आजवर तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘नकळत सारे घडले’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘ठरलं तर मग’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय मीरा नुकतीच ‘इलू इलू १९९८’ या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली.
© IE Online Media Services (P) Ltd