Milind Gawali And Medha Jambotkar: मराठी अभिनेते मिलिंद गवळी हे त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांसाठी ओळखले जातात. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर मालिकाविश्वातदेखील त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील त्यांची अनिरुद्ध ही भूमिका चांगलीच गाजली. फक्त पत्नीला फसवणारा पती, स्वार्थी नाही तर आई-वडिलांवर, मुलांवर भरभरून प्रेम करणारा असा अनिरुद्धदेखील पाहायला मिळाला. मिलिंद गवळी यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रेम दिले. आता मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मिलिंद गवळी यांच्यासह त्यांच्या पत्नी, अभिनेत्री मेधा जांबोटकर, स्मिता जयकर, ‘आई कुठे काय करते’च्या लेखिका नमिता वर्तक दिसत आहेत.

मिलिंद गवळींनी व्यक्त केल्या भावना

हे फोटो शेअर करताना मिलिंद गवळी यांनी लिहिले, “जवळजवळ सहा महिन्यानंतर हा एक सुवर्णयोग जुळून आला आहे. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका संपल्यानंतर मेधाताई जांबोटकर आणि मी असं ठरवायचो की आपण भेटूया. स्मिता जयकर आणि नमिता वर्तक यांनासुद्धा आमंत्रित करूया. मेधाताईंचे आणि स्मिताजींचे खूप ऋणानुबंध आहेत. स्मिताजींना ‘आई कुठे काय करते’ ही आमची मालिका खूप भावली होती. अनेक वर्ष न चुकता त्या आवडीने आमची मालिका पाहायच्या. तसंच नमिता वर्तक ‘आई कुठे काय करते’साठी लिहायची, त्यामुळे स्मिताजींना नमिताला आवर्जून भेटायचं होतं.”

“स्मिताजी आपली मालिका आवडीने बघतात याचं नमितालासुद्धा खूप कौतुक होतं. पण, या सगळ्या बायका अतिशय प्रतिभावान आणि खूप व्यग्र असल्यामुळे, त्यांचं एका वेळेला भेटणं शक्य होत नव्हतं. मालिका संपल्याच्या सहा महिन्यांनंतर आज हा योग जुळून आला.”

“शेवटी आज आम्ही सगळे मेधाताईंच्या पार्लेच्या घरी भेटलो. मी आणि दीपा, मेधाताई आणि श्री जांबोटकर, स्मिता जयकर, नमिता वर्तक आणि राकेश वर्तक असे आम्ही मेधाताईंच्या घरी भेटलो. उत्कृष्ट चविष्ट सारस्वत पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि मनसोक्त गप्पा मारल्या.

“माझ्या आणि मेधाताईंच्या मनातील अनेक वर्ष असलेली एक खंतपण नमिताला आम्ही सांगून टाकली. ती खंत म्हणजे, ‘आई कुठे काय करते’ मालिकेमध्ये अरुंधतीची आई म्हणजे मेधाताई आणि अनिरुद्ध देशमुख म्हणजे मी, आम्हा दोघांचा म्हणजे सासू आणि जावयाचा एकही सीन नमिताने लिहिला नव्हता.”

“आम्हा दोघांना एक तरी सीन एकत्र करायचा होता. खरंच अनिरुद्ध देशमुख आणि अरुंधतीच्या आईचा सीन किती भारी झाला असता. सासूने आपल्या मुलीवर अनिरुद्धने केलेल्या अन्यायाबद्दल किती खंत, राग किंवा दुःख व्यक्त केलं असतं. मालिका संपली आणि तो आमच्या दोघांच्या मनातला सीन राहूनच गेला.”

मिलिंद गवळी यांनी पुढे लिहिले, “पडद्यावरचं नातं किती कडवट होतं आणि प्रत्यक्षात मेधाताईंचं आणि माझं, आमचं नातं किती गोड, आदराचे आणि मायेचे आहे, हे कदाचित मालिकेच्या प्रेक्षकांना कळणार नाही.”

“आज स्मिताजींबरोबर त्यांच्या सिनेमांच्या आणि अध्यात्मावरच्या अशा सुरेख गप्पासुद्धा झाल्या. श्रीकृष्णाची दोन मधुर गाणीसुद्धा ऐकली. ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या माध्यमातून स्मिताजी आणि नमिताचं नातं आधीच निर्माण झालं होतं. आज स्मिताजी आणि नमिता पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटल्या, त्यांच्यामध्ये एक वेगळा सुरेख संवादसुद्धा झाला. माझा आणि दीपाचा वेळ कसा पुढे सरकत गेला आम्हा दोघांना कळलंच नाही. आम्ही दोघं गोड आठवणी घेऊन घरी आलो”, असे लिहित मिलिंद गवळी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

मिलिंद गवळी यांच्या पोस्टवर नमिता वर्तक व मेधा जांबोटकर यांनी कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मेधा जांबोटकर यांनी लिहिले, “मिलिंद, वेळ फुलपाखरासाररखा उडाला, यातच सगळं आलं. परत कधी? असं आत्तापासूनच वाटायला लागलं आहे”, तर नमिता वर्तक यांनी लिहिले, “मिलिंद किती गोड दिवस होता, सतत भेटत राहायला हवं. मेधाताई तर माझी आवडती आहेच, दीपा तर लाडकीच आहे; स्मिताताईंना भेटूनसुद्धा खूप छान वाटलं. जयंत काका खूप छान आहेत, मजा आली.”

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर मिलिंद गवळी हे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत झळकले होते.