दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले-थत्ते यांनी आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘तुला पाहते रे’, ‘राजा राणीची गं जोडी’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘इंद्रायणी’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘ईशाची आई’ असो किंवा ‘बेबी मावशी’ची भूमिका असो प्रत्येक भूमिकेला गार्गी यांनी पुरेपूर न्याय दिला. याशिवाय त्या काही हिंदी मालिकांमध्येही झळकल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मालिकाविश्वातून निवृत्ती घेतल्याचं सांगितलं होतं. या निर्णयावर ‘वास्तव कट्टा’ला दिलेल्या मुलाखतीत गार्गी फुले यांनी भाष्य केलं आहे.

गार्गी फुले म्हणाल्या, “मालिकेत काम करताना तुम्हाला एकही दिवस सुट्टी मिळत नाही. कारण, चॅनेलने आता ३० दिवस प्रक्षेपण सुरू केलंय. पूर्वी कसं होतं…शनिवार-रविवार इतर कार्यक्रम दाखवले जायचे, मालिका नसायच्या. पण, आता परिस्थिती बदलली आहे. सकाळी ८.३० चा कॉलटाइम असतो. सकाळपासून जे शूट सुरू होतं…ते शूटिंग रात्री दहापर्यंत चालू असतं. हे सगळं आटपून रात्री घरी जायला उशीर व्हायचा. बरं या सगळ्यात संध्याकाळी ७ नंतर काहीही खाणं व्हायचं नाही.”

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “आता चॅनेलची परिस्थिती इतकी वाईट आहे की, रात्री २ वाजता उद्याच्या शूटिंगचा कॉलटाइमचा मेसेज येतो. तोपर्यंत तुम्हाला समजत नाही की, उद्याच्या शेड्यूलमध्ये आपण आहोत की नाही. जर रात्री दोन-अडीच वाजता आपल्याला उद्याच्या शेड्युलचा मेसेज येणार असेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७-८ चा कॉलटाइम असेल तर, पहाटे उठावं लागतं. म्हणजे याचा अर्थ पहाटे ४-५ वाजता उठून आपण हे सगळं बघायचं. त्यात मी पुण्याला राहते त्यामुळे अशाप्रकारे उशिरा कॉलटाइम येत असल्याने मला सुट्टीच्या दिवशी घरी जायला मिळायचं नाही. जवळपास २३ ते २४ दिवस मी सलग काम केलंय. त्यानंतर जेव्हा आपण चार दिवस सुट्टीवर जातो तेव्हाही मनात गिल्ट असतं की…आपल्यामुळे शूटिंग रखडलं. हे सगळं मी दहा वर्षे केलं आणि आता मला खरंच कंटाळा आला. बरं हिंदीत काम करताना पैशांचं सुख असतं पण, मराठीत तेवढंही नाहीये…खूप कमी पैसे मिळतात.”

“मला असं वाटतं, मराठी मालिकांमध्ये काम करण्यासाठी पॅशन लागतं. कारण, मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना तेवढे पैसे मिळत नाहीत. काही सिनिअर कलाकार आहे, ज्यांना व्यवस्थित मानधन मिळतं. पण, कोणालाही भरमसाठ पैसे मिळत नाहीत. हिंदी मालिकांमध्ये काम करणारे कलाकार एक मालिका करतात आणि लगेच त्यांची मुंबईत घरं होतात, गाड्या होतात असं मराठी इंडस्ट्रीत अजिबात होत नाही. चॅनेलवाल्यांवर देखील सध्या खूप प्रेशर आहे. कारण, प्रत्येकाला टीआरपी मिळवायचा आहे. मी एकदा ३८ दिवस सलग काम केलंय. एकदा गणपतीची सुट्टी हवी होती तेव्हा ३ दिवस सलग काम केलं होतं. यानंतर आम्हाला २ दिवस सुट्टी मिळाली होती. एका २५ मिनिटांच्या एपिसोडमागे खूप मेहनत असते, हे सगळं अजिबात सोपं नाहीये.” असं गार्गी फुलेंनी सांगितलं.