Tharla Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि प्रियाची लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, मुळात अर्जुनचं लग्न प्रियाशी नव्हे तर सायलीशी होणार आहे. यासाठी तिच्या मदतीसाठी मालिकेत वेगवेगळे पाहुणे येत असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळालं आहे. नुकत्याच पार पडलेल्या मेहंदी सोहळ्यात मालिकेत ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अद्वैत आणि कलाने एन्ट्री घेतली होती. या दोघांनी मिळून प्रियाची फजिती केली होती. आता मालिकेत आणखी दोन नवीन पाहुणे येणार आहेत यांच्याबद्दल जाणून घेऊयात…
‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतील राया आणि मंजिरी खास पंढरपुरातून सायलीच्या मदतीसाठी येणार आहे. अभिनेत्री पूजा बिरारी मालिकेत मंजिरीची भूमिका साकारत आहे. तर, रायाच्या भूमिकेत अभिनेता विशाल निकम झळकत आहे. आता हे दोन नवीन पाहुणे मालिकेत आल्यावर सायलीला कशी मदत करणार जाणून घेऊयात…
अर्जुनला पळवून आणणार…
मंजिरी सायलीसाठी पंढपुरातून खास भेटवस्तू घेऊन येणार आहे. विठुरायाचा आशीर्वाद घेऊन तिने सायलीसाठी हिरव्या बांगड्यांचा चुडा आणल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. तर, राया सायलीची मोठी मदत करणार आहे. तो अर्जुनला सुभेदारांच्या घरातून थेट पळवून आणणार आहे.
राया सायलीला आनंदी करण्यासाठी सुभेदारांच्या घरी जातो आणि थेट अर्जुनच्या खोलीत घुसरून त्याला खांद्यावर टाकून पळवून आणतो. “सायली ताई तुम्हा दोघांचं लग्न नक्की होणार मला याची खात्री आहे” असा विश्वास राया सायलीला देतो. रायाने अर्जुनला खांद्यावर टाकून सायलीच्या घरी आणल्यावर हिरोचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो आपल्या बायकोला पाहून प्रचंड आनंदी होतो. पण, अर्जुन पूर्णा आजीच्या वचनात बांधला गेला असल्याने तो माघारी परत जायची दाट शक्यचा आहे.
त्यामुळे आता अर्जुन-सायलीचा विवाहसोहळा नेमका कसा पार पडणार, संगीत सोहळ्यात काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मालिकेतचा हा विशेष भाग ७ फेब्रुवारीला प्रसारित करण्यात येणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd