मुंबई : ठाणे येथील एका कारंज्याच्या प्रदूषित पाण्यातून बुधवारी ११ कासवांची सुटका करण्यात आली. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या कासवांचे पुनर्वसन करण्यात आले. ठाणे येथील माजिवडा व्हिलेज रोड, साईनाथ नगर परिसरातील एका कारंज्याच्या प्रदूषित पाण्यात मृत मासे तरंगत असून यामध्ये कासवही असल्याची माहिती या परिसरातील एका रहिवाशाने रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर (रॉ) या संस्थेला फोनवरून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माहिती मिळताच ‘रॉ’चे पथक वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बचावकार्यादरम्यान कारंज्याच्या पाण्यात एकूण ११ कासवे आढळली. कारंज्यासाठी वारण्यात येत असलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली होती. सुटका केलेल्या ११ पैकी नऊ कासवे ही भारतीय फ्लॅपशेल प्रजातीची, तर दोन रेड इअर्ड स्लाइडर प्रजातीची आहेत. दरम्यान, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर या कासवांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

हेही वाचा…अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक

त्यांना एक दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर योग्य त्या ठिकाणाची निवड करून या कासवांचे पुनर्वसन करण्यात आले, अशी माहिती रॉ संस्थेचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणामुळे तज्ज्ञांनी शहरातील कृत्रिम कारंजा किंवा अशा अनेक जलस्रोतांतील पाण्याची गुणवत्ता अत्यंत दूषित असून त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच त्यातील वनस्पती आणि प्राणी यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 turtles were rescued from polluted water of fountain in thane on wednesday sud 02