मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड अंतिम टप्प्यात आली आहे. निवड समितीने ८० अर्जामधून २० जणांची निवड केली आहे. येत्या शुक्रवारी, १९ मे रोजी उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ १० सप्टेंबर २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर पद रिक्त झाले होते. यानंतर कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी १५ मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कुलगुरूपदासाठी एकूण ८० जणांनी अर्ज भरल्यानंतर, निवड समितीने या अर्जाची छाननी करून १९ मे रोजी होणाऱ्या मुलाखतीसाठी २० जणांची निवड केली आहे. मुलाखतीनंतर निवड समितीकडून अंतिम ५ जणांच्या नावाची यादी कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर निवड राज्यपालांकडून करण्यात येणार आहे.
निवड समितीत कोण?
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जानेवारी २०२३ रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष डी.पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीत आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये यांचा समावेश आहे. हैदराबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश कुमार हे यूजीसीचे प्रतिनिधी म्हणून समितीमध्ये सहभागी आहेत.