मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने मुंबईकर हैराण झालेले असताना आता पशु-पक्ष्यांनाही फटका बसू लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये उन्हाच्या तडाख्यात पक्षी जखमी होण्याच्या घटनेत पाचपटीने वाढ झाली आहे. गेल्या १६ दिवसांमध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईत ५७ पक्षी आणि तीन श्वान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर परळ येथील दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल फॉर ॲनिमल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्चमध्ये तापमानात सातत्याने वाढ होत असून, तापमान ३८ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचले आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘उष्माघाता’चे प्रमाण रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली आहेत. वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांबरोबरच पक्षी व प्राण्यांनाही बसत आहे. मागील १६ दिवसांमध्ये मुंबईतील वाढत्या उष्णतेमुळे ५८ पक्षी जखमी झाले आहेत. निर्जलीकरण झाल्याने पक्षी बेशुद्ध पडल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापैकी अनेक पक्षी आकाशात उडताना अचानक खाली कोसळले, तर काही पक्षी झाडांवरून खाली पडल्याचे निदर्शनास आले. जखमी झालेल्या पक्ष्यांमध्ये सर्वाधिक संख्या घारींची आहे. या सर्व पक्ष्यांवर परळ येथील दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल फॉर ॲनिमल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पक्ष्यांप्रमाणे प्राण्यांनाही वाढत्या उन्हाचा फटका बसत आहे. आतापर्यंत तीन श्वान उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल फॉर ॲनिमल रुग्णालयाचे (बैलघोडा रुग्णालय) व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांनी दिली.

जखमी झालेले पक्षी

उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांमध्ये सर्वाधिक २६ घारींचा समावेश आहेत. त्याखालोखाल कबुतर (१८), कावळे (१२), पोपट (२) यांचा समावेश आहे. घार आकाशात उंचावर उडत असल्याने तिला उन्हाचा थेट फटका बसतो. त्यामुळे घारी जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे.

जखमींच्या संख्येत पाच पटीने वाढ

मार्चपासून उन्हाळा सुरू होत असला तरी उष्णतेचे प्रमाण कमी असते. मात्र यंदा तापमान अधिक वाढले आहे. त्याचा परिणाम पक्षी व प्राणी जखमी होण्यावर दिसून येत आहे. दरवर्षी मार्चमध्ये पक्षी जखमी होण्याचे प्रमाण तुलनेत फारच कमी असते. दरवर्षी साधारणपणे पहिल्या १५ दिवसांमध्ये ८ ते १० पक्षी जखमी होतात. मात्र यंदा हे प्रमाण बरेच वाढले असून, यंदा १६ दिवसांमध्ये ५८ पक्षी जखमी झाल्याची माहिती डॉ. मयूर डांगर यांनी दिली.

पक्ष्यांवर असे होतात उपचार

उन्हामुळे पक्ष्यांना निर्जलीकरणाचा त्रास होतो. त्यामुळे जखमी अवस्थेत आलेल्या पक्षांच्या शरीराचे तापमान अधिक असण्याबरोबरच त्यांना ताप असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना थंड पिंजऱ्यामध्ये ठेऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. आवश्यकता भासल्यास त्यांना आयव्ही सुद्धा चढविली जाते.

या उपाययोजना करा

पक्षी हे आकाशात उंचावर उडत असल्याने त्यांना उन्हाचा थेट फटका बसतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर, सज्जामध्ये पक्षांसाठी मोठ्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवावे. तसेच वस्ती असलेल्या ठिकाणी घार येत नसल्याने इमारतीच्या गच्चीवर त्यांच्यासाठी मोठ्या भांड्यात पाणी ठेवावे. जेणेकरून काही पक्ष्यांना या भांड्यामध्ये अंघोळ करता येऊ शकेल. पाळीव प्राण्यांना उन्हामध्ये बाहेर काढू नये. तसेच त्यांना तळलेले व मसालेदार, मासांहारी पदार्थ खाण्यास देऊ नये, असे आवाहन डॉ. मयूर डांगर यांनी केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 58 birds and three dogs injured in 16 days due to heat mumbai print news amy