देशांतर्गत विमान प्रवासाला सोमवारी सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही ४४ विमानांचे उड्डाण व आगमन झाले. यातील तीन फेऱ्या उशिराने धावल्याची माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाने दिली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला. एकूण ४ हजार २२४ प्रवाशांनी ये-जा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशांतर्गत विमान सेवा सुरू होताना मुंबई विमानतळावरून दिवसभरात जास्तीत जास्त ५० विमान फेऱ्या ये-जा करण्याची मंजुरी दिली आहे. त्यानुसार सोमवारी ४७ विमानांचे आगमन-उड्डाण झाले होते. यातून पहिल्या दिवशी ३ हजार ७५२ प्रवासी मुंबईबाहेर गेले. तर १,१०० प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले. मात्र अनेक फे ऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. जुन्या वेळापत्रकानुसार २५ मेपासून १७ शहरांसाठी ६४ विमान रवाना होणार होते. परंतु केवळ २४ विमानेच मुंबईतून जाऊ शकली. उर्वरित फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दुसऱ्या दिवशी २२ विमानांचे उड्डाण आणि २२ विमानांचे आगमन झाले. सकाळी ६.३० वाजता रांचीसाठी पहिले विमान उडाले. तर लखनौहून पहिले विमान सकाळी ८.२० वाजता विमानतळावर उतरले. यातील तीन विमाने उशिराने पोहोचल्याने प्रवाशांना काहीसा मनस्ताप झाला. दिवसभरात ३ हजार ११४ प्रवासी मुंबईतून बाहेर गेले, तर १ हजार ११० प्रवासी मुंबईत परतले.

प्रवाशांना भरुदड आयत्यावेळी रद्द होणाऱ्या विमान फेऱ्यांचा प्रवाशांनाच भरुदड सोसावा लागत आहे. विमान रद्द झाल्याचे सांगत प्रवाशांना तिकिटाचे पैसे मिळण्यासाठी तिकीट रद्द करण्याचे सांगण्यात येते. रद्द तिकिटाचे काही पैसे कापण्यात येतात. त्यानंतर पुन्हा लगेच दुसरे तिकीट हवे असल्यास आयत्यावेळी आकारण्यात येणाऱ्या वाढीव दराने नवे तिकीट खरेदी करावे लागते. पहिल्या दिवशी अनेक प्रवाशांना विमान फेऱ्या रद्द होण्याचा भरुदड पडला. ‘मी पंचवीस हजार प्रत्येकी याप्रमाणे माझे व माझ्या कुटुंबीयांचे अलाहाबादला जाण्यासाठी तिकीट काढले होते. मला विमान रद्द झाल्याचा संदेश आला आणि त्याबरोबर तिकीट रद्द करण्याची सूचनाही देण्यात आली. तिकीट रद्द केल्यास १२ हजार रुपये कापून उरलेली रक्कम देण्यात येणार आहे. विमानतळावरील कंपनीच्या प्रतिनिधींना विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले नाही. जायचे असल्यास नव्याने तिकीट काढा, असे सांगण्यात आले. नव्याने तिकीट काढायचे तर त्याचीही किंमत वाढली आहे,’ असे एका प्रवाशाने सांगितले. ‘विमान रद्द झाल्यामुळे अधिक दराने हॉटेल घेऊन राहावे लागेल. त्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे,’ असे मुंबईत मुलाखतीसाठी येऊन अडकलेल्या एका विद्यार्थ्यांने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrival of 44 aircraft during the day abn