मुंबई : मुंबईतील प्राचीन व आध्यात्मिक इतिहास लाभलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या सुशोभिकरण प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे. पालकमंत्री तथा स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते नुकतेच या कामाचे भूमिपपूजन करण्यात आले. दक्षिण मुंबईमधील मलबार हिल परिसरातील वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव आणि परिसराचा जिर्णोद्धार करण्याचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. वाराणसीच्या धर्तीवर या परिसराचा जिर्णाद्धार करण्यात येणार आहे. या कामासाठी साडेचार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाणगंगा तलावाला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. मलबार हिल टेकडीच्या पश्चिम किनाऱ्यावर हे गोड्या पाण्याचे कुंड आहे. समुद्राजवळच हे गोड्या पाण्याचे कुंड असल्यामुळे या बाणगंगा तलावाविषयी विशेष आकर्षण आहे. तलावाभोवती प्रार्थनास्थळे, समाधी, धर्मशाळा, मठ असून या तलाव परिसराला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही या तलावाच्या काठावर होत असतात. तलावाला लागूनच व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, बजरंग आखाडा व वाळकेश्वर मंदिर आहे. बाणगंगा तलावाला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळे या ठिकाणी विवध कार्यक्रम आयोजित केले जातात. या तलावाचे प्राचीन महत्त्व लक्षात घेऊन भाविक आणि देश – विदेशांतील पर्यटकही येथे येतात. त्यामुळे वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराला महाराष्ट्र सरकारने पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. मंगल प्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. बाणगंगा परिसराचे सुशोभिकरण करण्याचे कामही महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत सुरू आहे. या परिसरातील दीपस्तंभ, छोटी – मोठी मंदिरे, तलावाच्या पायऱ्या यांचेही जतन केले जाणार आहे.

हेही वाचा… याधीही चार वेळा दाऊदच्या मृत्यूची अफवा!

या प्रकल्पात तलावाच्या सभोतालचा परिसर, रामकुंड परिसर, बाणगंगा तलाव आदींची स्वच्छता, तलावाच्या पायऱ्या, संरक्षक भिंत, दीपस्तंभाची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार, तलावाच्या आतील बांधकाम काढणे, झडपेची दुरुस्ती आणि सुधारणा इत्यादी कामांचा समावेश आहे.

महानगरपालिकेने गेल्या वर्षभरापूर्वी बाणगंगा तलावाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. बाणगंगा परिसराला बकाल स्वरूप आणणारी अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. परिसरातील अतिक्रमणे हटवून त्याचे वारसापण जतन करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या कामाअंतर्गत ढिगाऱ्याखाली गाडल्या रामकुंडाचाही शोध लावण्यात यश आले आहे. आता रामकुंडाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. तसेच सुशोभिकरणाच्या कामांसाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या.

हेही वाचा… मलबार हिल जलाशयाची तज्ज्ञांच्या समितीने केली पाहणी, दक्षिण मुंबईतील नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे

या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात तलावाच्या दगडी पायऱ्यांची सुधारणा, दीपस्तंभांचे पुनरुज्जीविकरण, आकर्षक विद्युत रोषणाई व लेजर शो, तलावाच्या सभोवताली भक्ती मार्ग विकसित करणे, तलावाकडे जाण्यासाठी रस्ते तयार करणे, दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटवणे आदी कामांचा समावेश आहे. दुसऱ्य टप्प्यात तलाव परिसरातून दिसणाऱ्या इमारतीची एकसमान पद्धतीने रंगरंगोटी करणे, तलावाला लागून असलेल्या इमारतील भित्तीचित्रे व शिल्पे बसवणे, रामकुंड पुनरुज्जीवित करणे, मंंदिराचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. टप्पा ३ मध्ये बाणगंगा ते अरबी समुद्रादरम्यान विस्तृत मार्गिका बनवणे व या जागेतील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beautification of historic banganga lake soon ground breakingof work by guardian minister mumbai print nes asj