मुंबई : अनेकदा बेताची कौटुंबिक परिस्थिती, अपुऱ्या सोयी-सुविधा आणि आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे अनेकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडावे लागते. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना बहुसंख्य महिलांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. मात्र मनात जिद्द आणि शिकण्याची आवड असली की कोणत्याही परिस्थितीत यशाचे शिखर सर करता येते, हे रायगड जिल्ह्यातील पेणमधील ३३ वर्षांच्या भाग्यश्री कांबळे यांनी दाखवून दिले. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच नवव्या महिन्यात माघार न घेता भाग्यश्री कांबळे यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली आणि ३९ टक्के गुण मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या.

आई-वडिलांचे छत्र हरपल्याने शिक्षण सुटले…

पेणमधील भाग्यश्री कांबळे यांचे बालपण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील बापेरे या गावात गेले. भाग्यश्री कांबळे दीड वर्षांच्या असतानाच वडिलांचे छत्र हरपले आणि सातवीला असताना आईचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि आर्थिक बाजू कमकुवत होत गेली. त्यामुळे त्यांना सातवीनंतर शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. वयाच्या २४ व्या वर्षी भाग्यश्री यांचा गणेश जांभळे यांच्याशी विवाह झाला आणि त्या पेणमध्ये स्थायिक झाल्या.

‘सेकंड चान्स’ची संधी…

संसाराची जबाबदारी सांभाळत असताना भाग्यश्री यांना शिक्षणाची आवड सतत खुणावत होती. याचवेळी त्यांना प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेच्या ‘सेकंड चान्स’ या उपक्रमाबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाग्यश्री प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या शिकवणी वर्गाला जाऊन दहावीचा अभ्यास करू लागल्या.

गरोदर असल्याचे समजले…

तिसऱ्याच महिन्यात आपण गरोदर असल्याचे त्यांना समजले. तेव्हा त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आणि त्यांनी थांबायचे ठरवले. मात्र प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रोत्साहन, पती गणेश आणि कुटुंबियांच्या खंबीर पाठिंब्यामुळे त्यांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांना प्रत्यक्ष शिकवणी वर्गाला उपस्थित राहता आले नाही, त्यामुळे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने शिकवणी वर्गाला हजेरी लावली. त्या सातत्याने सराव करीत राहिल्या. बाळंतपणाचा व परीक्षेचा महिना एकच होता, मात्र त्यांनी माघार घेतली नाही आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विषयांची परीक्षा देऊन ३९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या.

‘महिलांनी कोणत्याही परिस्थितीत हार न मानता पुढे गेले पाहिजे. मला माझ्या पतीने तसेच कुटुंबियांना खंबीर पाठिंबा दिला. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येऊ शकते. आता एकीकडे आई बनण्याचा आणि दुसरीकडे दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन स्वप्न साकार झाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे’, असे भाग्यश्री कांबळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.