मुंबई: उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन होईल आणि भाजपचे आणखी काही आमदार पक्षातून बाहेर पडतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केले. जनमत विरोधात जात असल्यानेच भाजपचे आमदार पक्षाला रामराम ठोकत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर   या तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका लढवणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. उत्तर प्रदेशप्रमाणेच गोव्यातही भाजपच्या विरोधात वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे   नेते सिराज मेहंदी यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  प्रवेश केला. त्यांचे स्वागत शरद पवार यांनी केले. त्यानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आदी उपस्थित होते.

सिराज मेंहदी यांनी काँग्रेस पक्षात  अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आता राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षाशी आघाडीत निवडणूक लढणार आहे. उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशमध्ये सत्तापालट होणार असून स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा हा त्याचेच प्रतीक आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे भाजपच्या योगी सरकारचा पराभव होईल आणि समाजवादी पक्ष इतर सहकारी पक्षांसह सरकार स्थापन करेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.  आमच्या बाजूने ८० टक्के लोक आहेत तर २० टक्के  विरोधात आहेत, या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री हा सर्वाचा असतो.

२० टक्के लोक बाजूने नाहीत हे विधान अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या भावनांना छेद देणारे आहे. अशाप्रकारचे विधान मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीला शोभा देणारे नाही. पण त्यांच्या जे मनात आहे, तेच त्यांच्या ओठावर आले आहे, असा चिमटा पवार यांनी काढला.

गोव्यात आघाडीचे प्रयत्न

गोव्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे संजय राऊत हे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करीत आहेत. महाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याने इतरत्र फार काही अडचण येणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. .पुढील दहा दिवसांत आघाडीबाबत निर्णय होईल. पंजाबमध्ये कोणाचे सरकार येणार हे आताच सांगता येणार नाही. आप आणि काँग्रेस यांच्यात चुरस असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मणिपूरमध्ये मावळत्या विधानसभेत राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. या राज्यात राष्ट्रवादी किमान पाच जागा तरी लढणार आहे. मतदारसंघांची यादी काँग्रेसकडे सादर करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

यूपीएमध्ये काँग्रेस महत्त्वपूर्ण

यूपीएची फेरमांडणी केली पाहिजे. शरद पवार यांना अध्यक्ष केले पाहिजे असा मुद्दा सिराज मेहंदी यांनी मांडला. पण यूपीएमध्ये काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष असून काँग्रेसच्या साथीनेच भाजपविरोधातील राजकीय आघाडी काम करेल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते  सिराज मेहंदी यांनी मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change of power in uttar pradesh is certain says sharad pawar zws