मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच राज्य सरकार, म्हाडा आणि कामगार संघटना यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले. परिणामी, ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या घरावर १२ मार्च रोजी काढण्यात येणारा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा सर्व श्रमिक संघटनांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. इतक्या मोठ्या संख्येने घरे देण्यासाठी सरकारकडे जागाच नाही. त्यामुळे दीड लाख घरे कशी आणि कधी देणार असा प्रश्न कामगारांकडून वारंवार उपस्थित करण्यात येत आहे. यासाठी ठोस धोरण तयार करण्याची मागणीही करण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात सरकारकडून कोणतेही पाऊल उचण्यात येत नसल्याने गिरणी कामगारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्व श्रमिक संघटनेने आक्रमक भूमिका घेत १२ मार्च रोजी ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.

हेही वाचा >>> मुंबई : झोपु सदनिका विक्रीवरील १० वर्षांची अट शिथिल ? पूर्वलक्ष्यी प्रभावाबाबत मात्र संभ्रम

या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात सर्व श्रमिक संघटनेच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर म्हाडा, संघटना आणि सरकार यांची संयुक्त बैठक आयोजित करून कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. त्यामुळे तूर्तास १२ मार्च रोजी काढण्यात येणारा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती सर्व श्रमिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.  येत्या काही दिवसांमध्ये घरांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde promised march mill workers mumbai print news ysh