मुंबई : अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर आता अर्ज नोंदणी व पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेला २६ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. बुधवारी प्रवेशप्रक्रियेमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर शिक्षण संचालनालयाने हे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

आधीच्या वेळापत्रकानुसार २१ मे ते १३ जूनदरम्यान पहिल्या फेरीसाठी अर्ज नोंदणी, पसंतीक्रम, उच्च माध्यमिक विद्यालयांची निवड इत्यादीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र बुधवारी सकाळीच संकेतस्थळ बंद पडले. ही तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यासाठी लागणारा कालावधी आणि विद्यार्थीहित लक्षात घेत गुरुवारी दुपारी शिक्षण संचालनालयाने नवी घोषणा केली. त्यानुसार प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा २६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुरू करण्यात येणार आहे. अर्ज गुरुवारी दुपारी ३ वाजता सुधारित वेळापत्रक जाहीर केल्यानंतर अनेक विद्यार्थी व पालक अर्ज भरण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र संकेतस्थळ सुरूच होत नसल्याने अर्ज भरणे शक्य झाले नाही. अखेर शिक्षण संचालनालयाने २६ मे रोजी सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केल्याने विद्यार्थी व पालकांचा जीव भांड्यात पडला.

संकेतस्थळावर कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोईचे व सुलभ व्हावे, एकंदर प्रवेशाची कार्यवाही कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ व योग्य सोयी-सुविधा, विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्यामुळे कोणीही गोंधळून जाऊ नये, असे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.