मुंबई : ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाच्या २०१८ साली काढण्यात आलेल्या सोडतीतील घरांच्या किंमतीत १६ लाख रुपयांनी वाढ झाली असून घराची किंमत ४३ लाख रुपयांवरून थेट ५९ लाख रुपयांवर पोहोचली आहे. घराची किंमत कमी करण्यात यावी अशी मागणी वारंवार विजेत्यांकडून करण्यात येत आहे. आता या इमारतींना निवासी दाखला मिळण्यापूर्वी घराची रक्कम भरण्यास बाळकुम येथील विजेते आणि २००० सालच्या योजनेतील लाभार्थ्यांनी विरोध केला आहे. निवासी दाखला मिळाल्यानंतरच घराची रक्कम घ्यावी, अशी भूमिका या मंडळींनी घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : करोनानंतर मोबाइल चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले, रेल्वे प्रवासात दहा हजार प्रवाशांच्या मोबाइलवर डल्ला

कोकण मंडळाच्या बाळकुम गृहप्रकल्पातील सोडतीतील १२५ आणि २००० च्या योजनेतील ६९ लाभार्थ्यांच्या घरांच्या किंमतीत १६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. बहुमजली वाहनतळ, पाणीपुरवठा, व्याज आणि मेट्रो उपकर यामुळे घरांच्या किंमती वाढल्या आहेत. या घरांची किंमत ४३ लाख ४५ हजार २३६ रुपये होती. ती आता  ५९ लाख ७४ हजार ८०० रुपये झाली आहे. सोडतीच्या जाहिरातीत किंमती वाढतील असे नमूद करण्यात आले होते. मात्र थेट १६ लाख रुपयांनी किंमत वाढल्याने विजेत्यांनी/लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घरांना निवासी दाखला मिळालेला नाही. तत्पूर्वीच घराच्या किंमती वाढवून विजेते, लाभार्थ्यांना देकार पत्र पाठविण्यात आली आहेत. तसेच तीन टप्प्यात घराची रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. घराचा ताबा देण्यासाठी आधीच चार वर्षे विलंब झाला असून अद्याप निवासी दाखला मिळालेला नाही. असे असताना रक्कम का भरून घेतली जात आहे? असा प्रश्न विजेते, लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे. घरांची किंमत कमी करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी थेट सरकारला निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. निवासी दाखला मिळाल्यानंतरच घराची रक्कम भरून घ्यावी अशीही मागणी त्यांनी सरकार आणि मंडळाकडे केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy in balkum housing project after mhada increase flat rate mumbai print news zws