मुंबई : सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी केलेल्या कारवाईत बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाला अटक केली. आरोपीकडे ६१ दुर्मीळ वन्यप्राणी सापडले असून त्यांची सुटका करण्यात आली आहे. या सर्व प्राण्यांना मूळ देशात पाठवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

संबंधित आरोपीचे वर्तन संशयास्पद वाटल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. त्याच्या सामानाची तपासणी केली असता, सामानात वन्यप्राणी लपविले असल्याचे समजले. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे प्राणी ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचारांसाठी रेस्क्युइंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) या संस्थेकडे सुपूर्द केले. यामध्ये विविध प्रकारच्या संकटग्रस्त यादीत असलेले सस्तन प्राणी, सरीसृप, उभयचर आणि कीटक अशा विविध प्रजातींचा समावेश आहे. यामध्ये ब्लॅक ॲंड व्हाईट टेगु, कस्कस, सेंट्रल बेअर्डेड ड्रॅगन, होंडुरन मिल्क स्नेक यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणी वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली असून तस्करी केलेल्या प्राण्यांचे मूळ आणि हेतू निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे. याचबरोबर भारतीय प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर वन्यजीव संरक्षण कायदा आणि संकटग्रस्त प्रजातींमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करार (सीआयटीईएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॅंकॉकवरून सर्वाधिक वन्यजीव तस्करी

थायलंड हा दुर्मीळ वन्यजीव प्राण्यांचे अस्तित्व असलेला सर्वात मोठा देश आहे. तेथे मोठ्या प्रमाणात असे ‘एक्झॉटिक’ प्राणी पाळले जातात. थायलंडमध्ये याला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे देश – विदेशातील विक्रेते आणि तस्कर थायलंडमध्ये येत असतात. ऑनलाईन आणि समाज माध्यमाद्वारे ते स्थानिक विक्रेते आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी सहज संपर्क साधतात. अनेक देशांतून खास आणि दुर्मिळ प्रजातींच्या वन्यजीवांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. असे प्राणी पाळण्यासाठी, खेळासाठी तसेच औषधासाठी उपयोगात आणले जातात. बॅंकॉकमधून थेट विमान सेवा आहे आणि तेथून वन्यजीव आणणे किफायतशीर असल्याचेही रॉचे संचालक पवन शर्मा यांनी सांगितले.

वन्यजीव तस्करी म्हणजे काय ?

भारतात वन्यजीवांची तस्करी हा एक गंभीर गुन्हा मानला जातो आणि यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा आणि कस्टम्स कायद्यानुसार कारवाई केली जाते. वन्यजीव तस्करी म्हणजे निसर्गातील प्राणी, पक्षी,एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे म्हणजे वन्यजीवांची तस्करी होते. कायदेशीर परवानगीशिवाय या प्राणी पक्ष्यांना पकडून, विकले जाते, त्यांची आयात–निर्यात केली जाते. यासाठी जीवित प्राण्यांना बंधनात, लपवून ठेवले जाते. त्यामुळे अनेकदा ते मरण पावतात.