मुंबई : गोवंडीमधील बेस्टच्या शिवाजी नगर बस आगारासमोरील दुभाजक अपघाताला कारणीभूत ठरत असून काही दिवसांपूर्वी याच दुभाजकामुळे झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने तत्काळ रस्त्याच्या मधोमध असलेला दुभाजक हटवावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोवंडी-शिवाजी नगर परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन बेस्टने काही वर्षांपूर्वी रफिक नगरमधील ९० फूट रस्त्यालगत नवीन बस आगार उभे केले. या आगारातून मुंबईच्या विविध भागात जाण्यासाठी बसगाड्या सोडण्यात येतात. त्यामुळे या आगारात प्रवाशांची कायम वर्दळ असते. प्रवाशांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन बेस्टने या आगारासाठी मोठ्या प्रमाणात विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित बसगाड्या उपलब्ध केल्या. मात्र आगारातून बाहेर पडणाऱ्या बसगाड्यांना मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेला दुभाजक अडथळा बनत आहे.

हेही वाचा: उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

नवीन वातानुकूलित बसगांड्या लांबी आणि रुंदीने मोठ्या असल्याने आगाराबाहेर पडल्यानंतर त्यांना वळसा घेताना दुभाजकाचा अडथळा होत आहे. त्यामुळे वारंवार येथे बेस्ट बसचा अपघात होत असून काही वेळा बसगाड्यांचे नुकसान होत आहे. शिवाय अनेक वेळा वळसा घेताना काही वाहनांना बसची धडक बसत असून या आगारातील बेस्ट बसचालक त्रस्त झाले आहेत. महिन्याभरापूर्वी अशाच प्रकारे वळसा घेत असताना बेस्ट बसची धडक बसून अमीर इंद्रिसी (१२) याचा मृत्यू झाला होता. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बेस्ट बसचालकाला अटक केली होती. अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने हा दुभाजक हटवावा अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for removal of divider in front of govandi shivaji nagar best depo mumbai print news tmb 01