मुंबई : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोसळलेल्या पावसामुळे आवाज फाऊंडेशनला फटाक्यांमुळे होणाऱ्या आवाजाच्या पातळीची मोजणी करणे शक्य झाले नाही. परिणामी, आवाज फाऊंडेशनला यंदा दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांच्या आवाजाच्या पातळीचा अहवाल सादर करता येणार नाही. गेली तब्बल २१ वर्षे आवाज फाऊंडेशनतर्फे यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात येत होता. परंतु प्रथमच त्यात खंड पडला आहे.
दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. प्रामुख्याने नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ध्वनीप्रदूषणाचा परिणाम अधिक तीव्रतेने होतो. आवाजाची पातळी ७० डेसिबलपेक्षा अधिक असल्यास त्याचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो. यामुळे बहिरेपणा, रक्तदाब, हृदयरोग अशा विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागतो. दिवाळीत अनेकदा ध्वनी प्रदूषणाची तीव्रता १०० ते ११५ डेसिबलपर्यंत पोहोचते. दरम्यान, ‘आवाज फाऊंडेशन’तर्फे दरवर्षी दिवाळीत मुंबई शहर आणि उपनगरांतील आवाजाची पातळी मोजली जाते. फाऊंडेशनने २००३ पासून गणेशोत्सवातील आवाजाची पातळी मोजण्यास सुरुवात केली आहे.
गेली अनेक वर्षे आवाजाच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याचे आवाज फाउंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. तरीही या परिस्थितीत कोणतेही बदल होत नसल्याची, तसेच सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याची खंत आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलअली यांनी व्यक्त केली. यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत होता. पाऊस पडत असताना आवाजाची नोंद नीट होत नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे यंदा फाऊंडेशनकडून दिवाळीतील आवाजाची पातळी मोजण्यात आली नाही.
यापूर्वीचा अहवाल
मरीन ड्राईव्ह परिसरात २०२४ मधील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ९ ते ११.२५ या वेळेत ८२ ते ११७ डेसिबल आवाजाची नोंद झाली. शिवाजी पार्क परिसरात ११.४५ पर्यंत ९५ डेसिबल, तर कार्टर रोड येथे ७२ ते ८५ डेसिबल आवाज नोंदवला गेला. मरीन ड्राईव्ह, शिवाजी पार्क परिसरात सर्वाधिक ध्वनीप्रदूषणाची नोंद झाली होती. याचबरोबर २०२२ मध्ये मरीन ड्राईव्ह येथे सर्वाधिक आवाजाची पातळी १०९.१ डेसिबल नोंदली गेली होती. शिवाजी पार्क येथे २०२१ मध्ये सर्वात जास्त १००.४ डेसिबल आवाज नोंदवला गेला होता.
