मुंबई : सौराष्ट्राकडून धूलिकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला. हवेत मोठय़ा प्रमाणावर धूलिकण साचल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. गेल्या दहा वर्षांतील मुंबईतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद रविवारी झाली. सहा ते सात अंशानी कमाल तापमानात घट झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी सकाळी अंधेरी, विलेपार्लेसह काही भागांत पावसाची रिपरिप सुरू होती. त्याच वेळी सौराष्ट्रावरून येणाऱ्या वाऱ्यांसह वाहून आलेले धूलिकण मुंबईच्या वातावरणात मिसळले. रविवारी दिवसभर त्यांचा प्रभाव मुंबईत जाणवत होता. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. सोमवारी सकाळपर्यंत हवेतील धूलिकण कायम राहणार असून तापमानातही घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

विक्रमी तापमानघट

मुंबईच्या कमाल तापमानात रविवारी सरासरीच्या तुलनेत विक्रमी घट दिसून आली. कुलाबा येथे २४ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. सरासरीच्या तुलनेत दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ६ आणि ७ अंशांची घट झाली होती. हे गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमान आहे. कुलाबा येथे २१.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.

प्रदूषणवाढ

रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मालाड येथील ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ ४३६ म्हणजेच ‘तीव्र प्रदूषण’ या श्रेणीत होता. भांडुप येथे ३३६, माझगाव येथे ३७२, वरळी येथे ३१९, वांद्रे

कुर्ला संकुल येथे ३०७, चेंबूर ३४७, अंधेरी ३४० असा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ नोंदवला गेला. त्यामुळे येथील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत होती. कुलाबा येथील

‘हवा  गुणवत्ता निर्देशांक’ २२१ म्हणजेच ‘वाईट’ श्रेणीत होता.

पांढऱ्या, राखाडी रंगाचा धुळीचा थर

सौराष्ट्राकडून आलेले धूलिकणयुक्त वारे आणि त्याच वेळी मुंबईत सुरू झालेली पावसाची रिपरिप यामुळे रस्ते, वाहने यांच्यावर पांढऱ्या, राखाडी वाळुकणांचा थर साचला होता. विलेपार्ले पूर्व येथील पार्ले मार्केट, सुभाष मार्ग, महात्मा गांधी मार्ग, हनुमान मार्ग येथे सकाळी ९ वाजता पांढऱ्या, करडय़ा रंगाची राख आढळली, अशी माहिती ‘जवाहर बुक डेपो’त काम करणारे दीपक कडू यांनी दिली. रविवारी सकाळी वातावरणात धुरके दिसत होते. हळूहळू ऊन पडू लागल्यावर त्याचे प्रमाण कमी झाले, असे ‘पार्ले पंचम’चे श्रीधर खानोलकर यांनी सांगितले. सकाळी ७.३० ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान पाल्र्याच्या वातावरणात धूलिकण दिसल्याचे मनसेचे सुधाकर तांबोळी यांनी सांगितले.

राज्यातील स्थिती

हवामानात अचानक मोठा बदल होऊन रविवारी राज्याच्या बहुतांश भागांवर धूळ आणि धुक्याचे मळभ निर्माण झाले. वाढलेल्या आद्र्रतेतून निर्माण झालेले धुके आणि धूळ वाढवणाऱ्या वेगवान वाऱ्याच्या एकत्रित परिणामाने ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ही स्थिती ठळकपणे जाणवली. हवेतून येणाऱ्या बाष्पामुळे मुंबई परिसरासह कोकण विभागात आणि उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम मध्य महाराष्ट्रात गेले दोन दिवस पावसाळी वातावरण होते. मुंबई आणि कोकणात काही भागांत हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश भागांत या कालावधीत ढगाळ वातावरण होते. शनिवारी रात्रीपासून आद्र्रतेत वाढ होत गेली. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर धुके निर्माण झाले. कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्रात काही भागांत रविवारी सकाळपासून धुक्याची स्थिती होती. रविवारी सकाळी उत्तर कोकणाच्या बहुतांश भागांत धूळ वाढवणारे वारे वाहत होते. मोठय़ा प्रमाणावर धुके आणि धूळ वातावरणात मिसळल्याने दृश्यमानता कमी झाली होती. अनेक ठिकाणी आकाश धुरकट दिसत होते.

कशामुळे घडले?

कराची येथे धूलिकणांचे वादळ निर्माण झाले होते. तेथून येणारे वारे सौराष्ट्रावरून येताना तेथील पांढऱ्या, राखाडी रंगाची वाळू घेऊन आले. त्याच वेळी मुंबईत पावसाची रिपरिप सुरू होती. परिणामी काही ठिकाणी पांढऱ्या, राखाडी रंगाचा थर आढळला, असे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.

अंदाज काय?

राज्यात धुके आणि धुळीची स्थिती सोमवापर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र रात्रीच्या कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट होणार आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत कडाक्याच्या थंडीची चिन्हे आहेत. उत्तरेकडील राज्यांच्या किमान तापमानात ३ ते ४ अंशांनी घट होणार असून तेथील थंड वारे दाखल होऊन किमान तापमानात २ ते ४ अंशांनी घट होणार असल्याने थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dust on mumbai a big drop in temperature akp
First published on: 24-01-2022 at 01:28 IST