मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेते प्रताप सरनाईक यांच्यामध्ये फोनवर मतभेद होऊन शाब्दिक बाचाबाची झाल्याच्या जोरदार चर्चा आहेत. याबाबत नेमकी वस्तूस्थिती काय? असा प्रश्न पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना विचारला. विशेष म्हणजे यावेळी प्रताप सरनाईकही उपस्थित होते. यावर एकनाथ शिंदे यांनी अगदी थोडक्यात प्रतिक्रिया देत सविस्तर बोलणं टाळलं. “आम्ही दोघेही तुमच्यासमोर आहोत. आम्ही काम करणारी लोकं आहोत,” असं मत शिंदेंनी व्यक्त केलं. ते शुक्रवारी (३० सप्टेंबर) मुंबई येथे आयोजित ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.०’ शुभारंभ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही दोघेही तुमच्यासमोर आहोत. आम्ही काम करणारी लोकं आहोत. त्यामुळे आमचं लक्ष या राज्याला विकासाकडे नेण्यावर आहे. जे लोकांना अपेक्षित आहे ते काम आम्ही करत आहोत.”

“एखादं काम सुरू होतं आणि वर्षानुवर्षे रेंगाळतं”

“एखादं काम सुरू होतं आणि वर्षानुवर्षे रेंगाळतं. आपल्या सरकारमध्ये असं कोणतंही काम होणार नाही. लोकांना आपलं शहर स्वच्छ सुंदर झालेलं आणि त्याला अपेक्षित सोयीसुविधा देण्याचं काम करू,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

“सरकारच्या पैशांचा योग्य वापर झाला पाहिजे”

‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.०’ शुभारंभ कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदेंनी मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून ठेकेदारांना धारेवर धरलं. ते म्हणाले, “काही ठिकाणी व्हिडीओ येतात. त्यात लोकं रस्त्यावरील डांबर हाताने काढून दाखवतात. असं काम आपण कसं सहन करू शकतो. त्यामुळे सरकारचे जे पैसे जातात त्याचा योग्य वापर झाला पाहिजे.”

आपण ठेकेदारासाठी हे काम काढलं असं लोकांनी म्हणता कामा नये”

“आपण ठेकेदारासाठी हे काम काढलं असं लोकांनी म्हणता कामा नये. जे काम आपण करू ते टिकलं पाहिजे. ही जबाबदारी आपल्या अधिकाऱ्यांची आहे. पैसे देण्याचं काम सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे, पण चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

“मुंबई महानगरपालिकेला पैशांची अडचण आहे का?”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “मुंबई महापालिका एवढी मोठी आहे, आर्थिक परिस्थिती चांगली आहे, तरी मुंबईत एवढे खड्डे आहेत. याबाबतीत काय निर्णय घेता येईल असं मी बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांना विचारलं. ते म्हणाले आपण दरवर्षी थोडे थोडे काँक्रेटचे रस्ते घेतो. मी म्हटलं, थोडे थोडे का घेतो? पैशांची काही अडचण आहे का? ते म्हटले नाही.”

“यावर्षी ४५० किलोमीटर काँक्रेट रस्त्यांच्या कामाचे आदेश”

“यानंतर मी त्यांना यावर्षी ४५० किलोमीटरचे काँक्रेटचे रस्त्यांचं काम करण्यास सांगितलं आहे. त्यांनी दुसऱ्या दिवशी या कामाच्या टेंडरचं काम सुरू केलं. आता मुंबई महानगरपालिकेने ५,५०० कोटी रुपयांचे काँक्रेट रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती शिंदेंनी दिली.

“मार्चमध्ये मुंबईतील उरलेले सर्व रस्ते काँक्रेटचे होतील”

काँक्रेट रस्त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुंबईसाठी आपल्याला काम केलं पाहिजे, मुंबईचा चेहरामोहरा बदलला पाहिजे असं म्हटलं. शांघाय बिंगाय जाऊ द्या, पण आपण स्वच्छ आणि सुंदर मुंबई करू शकू. त्याची सुरुवात झाली आहे. येत्या मार्चमध्ये मुंबईतील उरलेले सर्व रस्ते काँक्रेटचे होतील यासाठी काम सुरू आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षात मुंबईत एकही खड्डा बघायला मिळणार नाही.”

हेही वाचा : CM शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये फोनवरुन बाचाबाची? पूर्वेश सरनाईकांनी दोन्ही नेत्यांना टॅग करुन पोस्ट केलेला फोटो चर्चेत

“असं कुठंही खपवून घेतलं जाणार नाही”

“प्रकल्प मंजूर होतात, पण ते पूर्ण होत नाहीत. एखादा ठेकेदार एकदम बिनकामाचा निघतो. त्यामध्येही काही गोष्टी अव्यवहार्य झालेल्या असतात. त्याचा फटका शहरांना बसतो. असं कुठंही खपवून घेतलं जाणार नाही. जे रस्ते बांधतो किंवा दुरुस्त करतो ते काम गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे. ती शेवटी आपली जबाबदारी आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde comment on speculations of dispute with pratap sarnaik rno news pbs
First published on: 30-09-2022 at 15:23 IST