मुंबई : राज्यातील सर्वच विभागांतील रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरू असून परीक्षा पारदर्शी पद्धतीने सुरळीतपणे पार पाडल्या जात आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विधानसभेत स्पष्ट केले. त्यात कोणताही गोंधळ नसून वृत्तपत्रांमधील काही बातम्या चुकीच्या आहेत. त्यातून शासनाची बदनामी तर होतेच आणि विद्यार्थ्यांमध्येही नैराश्य येते. हे असेच सुरू राहिले, तर वृत्तपत्रातील बातम्यांबाबतही हक्कभंग आणावा लागेल असा इशारा दिला.

नाशिक जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक यांना लाच घेताना अटक केल्याबाबतचा प्रश्न सदस्य लहू कानडे यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, या प्रकरणांमध्ये नाशिक जिल्हा सहकार उपनिबंधकांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित आहे. सहकार विभागाचे काम अधिक गतीने आणि सुरळीत चालण्यासाठी ठरलेल्या मुदतीत सर्व पदे भरण्यात येतील. ही भरती पारदर्शक पद्धतीने केली जात आहे.

त्यावर फडणवीस म्हणाले, एखाद-दुसऱ्या ठिकाणी तक्रारी आल्याने परीक्षा रद्द झाल्या. पण अनेक परीक्षा सुरळीतपणे पार पडत आहेत आणि हजारो विद्यार्थी त्या देत आहेत. टीईटी परीक्षेप्रमाणे या प्रक्रियेत खासगी कंपन्या नाहीत. पण ठरलेल्या मुदतीत परीक्षा होऊन सर्व पदे भरली जातील.