संभाजी भिडे हे राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतात. संपूर्ण देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने त्यांचा आजच बंदोबस्त करावा आणि त्याबाबत सभागृहत निवेदन करावे, अशी मागणी काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाळासाहेब थोरात म्हणाले, “संभाजी भिडे हे विकृती आहेत. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत अत्यंत अवमानकारण विधान केलं आहे, जे देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार वादग्रस्त विधाने करतात. त्यांना पाठीशी घालणाऱ्याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे, हे ओळखलं पाहिजे.”

हेही वाचा : संभाजी भिडेंच्या अटकेसाठी पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

“कोणाच्या राजकीय फायद्यासाठी ते वारंवार अशी विधाने करतात? आम्ही सभागृहात संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

“पुरोगामी विचार संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करत आहे. महापुरुष हे सर्वकालीन असतात, त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते. असे असताना हा सततचा खोडसाळपणा सरकारने सहन करू नये. कालही आम्ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती,” असं थोरात यांनी म्हटलं.

हेही वाचा : राष्ट्रवादीचा दुसरा गट महायुतीत येईल? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकत्र…”

“या संपूर्ण प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाही. भिडेंसारख्या विकृतीवर वेळीच कारवाई केली, तर सरकारचा हेतू शुद्ध आहे असे म्हणलं जाईल,” असेही थोरात म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt action against sambhaji bhide demand balasaheb thorat ssa