मुंबई : मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीची फेब्रुवारी २०२५ मध्ये दरवाढ करण्यात आली. त्यानुसार रिक्षा आणि टॅक्सीचे अनुक्रमे २६ आणि ३१ रुपये भाडे आकारण्यात येत आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली. नवीन दरानुसार भाडे आकारणीसाठी मीटरचे रिकॅलिब्रेशन करणे आवश्यक आहे. परंतु, मुंबईतील सुमारे ७० टक्के रिक्षा, टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के रिक्षा, टॅक्सीचालकांना रिकॅलिब्रेशन करण्यासाठी ३१ मेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १ जूनपासून रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा, टॅक्सीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

इंधन खर्च, वाहनांची देखभाल-दुरूस्ती, वाहन कर्जावरील वाढलेले व्याजदर लक्षात घेऊन आणि खटुआ समितीच्या शिफारशींचा दाखला देत मुंबईतील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यानुसार, १ फेब्रुवारी २०२५ पासून टॅक्सी आणि ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यास मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने (एमएमआरटीए) मान्यता दिली. यानुसार रिक्षाचे किमान भाडे २६ रुपये आणि टॅक्सीचे किमान भाडे ३१ रूपये झाले. मीटरचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत दरपत्रकानुसार भाडे आकारण्याची सूचना करण्यात आली होती. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुमारे ४.६२ लाखांहून अधिक रिक्षा आणि टॅक्सी असून यापैकी सुमारे ७० टक्के रिक्षा, टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के रिक्षा, टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन अद्याप झालेले नाही.

मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २३ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत टॅक्सी व ऑटोरिक्षाच्या भाडेवाढीस मान्यता देण्यात आली होती. तसेच, ही भाडेवाढ १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू करण्याचे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने निर्देश दिले होते. या भाडेवाढीच्या अनुषंगाने मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यासाठी ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, बहुसंख्य टॅक्सी व ऑटोरिक्षाच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन झालेले नव्हते. त्यामुळे यासाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपुष्टात आल्यानंतरच्या १ जून २०२५ पासून विलंबासाठी प्रतिदिन विभागीय दंडात्मक शुल्क आकारण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पुढील एका आठवड्यात मुंबई महानगरातील रिक्षा, टॅक्सीचे मीटर रिकॅलिब्रेशन करून घेणे अपेक्षित आहे. जर, रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास दर दिवशी ५० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरातील १० आरटीओ कार्यालयांमध्ये ४.१७ लाख रिक्षा आणि ४४,८२५ टॅक्सी आहेत. आतापर्यंत नोंदणीकृत रिक्षा आणि टॅक्सीचे अनुक्रमे ६५.८० टक्के आणि ६८.३९ टक्के रिकॅलिब्रेशन झाले आहे.

मुंबई मध्य आरटीओमध्ये ७९ टक्के टॅक्सी रिकॅलिब्रेशन पूर्ण.

मुंबई पश्चिम आरटीओमध्ये रिक्षांचे ६६.२७ टक्के आणि टॅक्सीचे ६८.२३ टक्के रिकॅलिब्रेशन पूर्ण.

मुंबई पूर्व आरटीओमध्ये रिक्षांचे ७१.९८ टक्के आणि टॅक्सीचे ६३.३१ टक्के रिकॅलिब्रेशन पूर्ण.

बोरिवली आरटीओमध्ये रिक्षांचे ७८.९१ टक्के आणि टॅक्सीचे २०.७५ टक्के रिकॅलिब्रेशन पूर्ण.