मुंबई : कांदिवली पूर्व येथे महिलांसाठी भारतातील पहिल्या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या फिरत्या स्नानगृहाचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्या स्नानगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. कांदिवली विधानसभा क्षेत्रात १२ तासांसाठी फिरते स्नानगृह कार्यरत राहील.

झोपडपट्टीतील महिलांना स्नानगृहांचा फायदा होणार असून, त्यामुळे स्वच्छ भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे जात आहोत, असे मत लोढा यांनी त्यावेळी व्यक्त केले. तसेच, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृहाची समस्या अतिशय त्रासदायक ठरते. तो त्रास कमी करण्यासाठीच जिल्हा नियोजन समितीमार्फत भारतात फिरत्या स्नानगृहाचा पहिला प्रकल्प राबवला आहे. इतर ठिकाणीही हा प्रकल्प राबवू, असे आश्वासन लोढा यांनी उपस्थितांना दिले.

फिरत्या बसमध्ये एकूण ५ स्नानगृहे असून त्यात शॉवरची व्यवस्था आहे. तसेच, त्यात २१०० लिटर इतकी पाण्याची क्षमता आहे. बेसिन आणि इतर आवश्यक सुविधा आहेत. विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना आपले कपडे वाळवण्यासाठी २ ड्रायर यंत्रही उपलब्ध करण्यात आले आहे. विद्युत पुरवठ्यासाठी येथे जनरेटर्सचा वापर करण्यात येणार आहे. पाण्याचा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी, तसेच योग्य नियोजनातून सर्वांना स्नानगृहाचा वापर करण्याची संधी मिळावी, यासाठी स्नानगृहात महिला कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. येथे प्रत्येक महिलेला ५ ते १० मिनिटे इतका वेळ स्नानासाठी दिला जाईल आणि वेळ झाल्यावर पाणीपुरवठा बंद होईल.