मुंबई : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर-शिर्डी असा ५२० किमीचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाला असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) शिर्डी ते मुंबई या टप्प्याच्या कामाचा वेग वाढवला असून त्यानुसार शिर्डी ते भरवीर अशा ८० किमीच्या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम मार्चमध्ये पूर्ण करून हा टप्पा मार्चअखेरीस वाहतुकीस खुला करण्याचे एमएमआरडीसीचे नियोजन आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर ते नाशिक प्रवास पाच ते साडेपाच तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.

मुंबई ते नागपूर असा ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग एमएसआरडीसीकडून बांधला जात आहे. यातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा महामार्ग डिसेंबर २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या महामार्गावरून ताशी १२० किमी वेगाने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे नागपूर ते शिर्डी अंतर केवळ पाच तासांत पूर्ण करणे शक्य होत आहे. मार्चमध्ये शिर्डी ते भरवीर असा ८० किमीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

समृद्धी महामार्ग टप्प्याटप्प्यात सुरू करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. त्यानुसार शिर्डी ते भरवीर टप्पा मार्चअखेरीस सेवेत दाखल झाल्यानंतर भरवीर ते इगतपुरी महामार्ग जूनपर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.