मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक (वरळी नाका) टप्पा २ अ वाहतूक सेवेत दाखल होऊन नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्याने मेट्रो ३ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. मात्र ही वाढ फार मोठी वा समाधानकारक नाही. त्यामुळेच महिन्याभराच्या कालावधीत आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान १४ लाख ४९ हजार ९३८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. म्हणजे दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांपेक्षा कमी आहे.

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेची बांधणी केली जात आहे. या ३३.५ किमीच्या मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा आॅक्टोबर २०२४ मध्ये सेवेत दाखल झाला आहे. तर १० मे रोजी अर्थात महिन्याभरापूर्वी बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा २ अ सेवेत दाखल झाला आहे. त्याचवेळी आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक ते कफ परेड अशा टप्पा २ ब चे काम सुरु असून हा टप्पा आॅगस्टपर्यंत सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

टप्पा २ ब वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावणार आहे. दरम्यान आरे ते बीकेसीदरम्यान दिवसाला चार लाख प्रवासी प्रवास करतील असा दावा एमएमआरसीकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यावर दिवसाला अंदाजे २० हजार प्रवासी प्रवास करत होते. ही संख्या खूपच कमी असल्याने मेट्रो ३ ला टीकेला सामोरे जावे लागत आहे. आरे ते बीकेसीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसतानाच एमएमआरसीने बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा टप्पा २ अ वाहतूक सेवेत दाखल झाल्यास त्याला मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. मात्र तरीही दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांचा टप्पा पार करु शकलेली नाही. दिवसाला सरासरी ४७-४८ हजार प्रवासी या मार्गिकेवरुन प्रवास करताना दिसतात.

पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून अर्थात ७ आॅक्टोबर २०२४ ते ९ जून २०२५ दरम्यान आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक मार्गिकेदरम्यान एकूण ५७ लाख ५५ हजार ४२० प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातील १४ लाख ४९ हजार ९३८ प्रवाशी हे १० मे ते ९ जून दरम्यान प्रवास करणारे आहेत. एकूणच दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतरही मेट्रो ३ प्रवाशांना आकर्षित करु शकलेली नाही.

खासगी संस्थेची पायधरणी

प्रवासी संख्या वाढत नसल्याने आता एमएमआरसीने खासगी संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संस्था प्रवासी संख्या वाढविण्यासाठीच्या उपाययोजनांचा, पर्यायांचा अभ्यास करत सहा महिन्यात एमएमआरसीला अहवाल सादर करणार आहे. त्यानुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.