मुंबई : परदेशातून ३६३० मेट्रीट टन अक्रोडाची आयात करून सुमारे ४२ कोटी रुपयांचा कर गैरव्यवहार केल्याप्रकरणी नवी मुंबईतील कंपनीच्या मालकाला महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआयने) अटक केली. चिली या देशातून या अक्रोडाची आयात करण्यात आली होती. याप्रकरणी डीआरआयचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. आकाश अग्रवाल असे अटक आरोपीचे नाव असून तो नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील रहिवासी आहे.

आरोपी आयात करण्य़ात आलेल्या मालाची किंमत कमी दाखवून सीमाशुल्क बुडवत असल्याचे डीआरआयच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार डीआरआयने अधिक तपास केला असता चिली येथील पुरवठादार याने आकारलेल्या रकमेपेक्षा ५० ते ७० टक्के रक्कम कमी दाखवून आरोपीने ३६३० मेट्रीक टन अक्रोड आयात केला. त्यात ४२ कोटी रुपयांचा सीमाशुल्क बुडवण्यात आल्याचा आरोप आहे.

कागदोपत्री ही रक्कम कमी दाखवण्यात यायची. उर्वरीत रक्कम रोख स्वरूपात चिली येथील पुरवठादाराला पाठवण्यात यायची. त्यासाठी हवाला रॅकेटचा वापर करण्यात येत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी डीआरआय अधिक तपास करत आहे.