मुंबई : पावसाळा तोंडावर आल्यामुळे रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना महानगरपालिका प्रशासनाने वेग दिला असून ३० मेपर्यंत कामे पुर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. तसेच, येत्या २० मेनंतर रस्त्यांवर काँक्रीट टाकले जाणार नाही. त्यानंतर काँक्रीटीकरणाव्यतिरिक्त अंतिम टप्प्यातील उर्वरित कामे पूर्ण करण्यावर भर देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. उर्वरित रस्त्यांवर आवश्यकतेनुसार मास्टिक अस्फाल्ट टाकून रस्ते वापरायोग्य करण्यात येणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेली रस्ते काँक्रीटीकरणाची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पावसाळा तोंडावर आल्यामुळे काँक्रीटीकरणाच्या कामांना वेग देण्यात आला आहे. संबंधित कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर सातत्याने रस्ते कामांची पाहणी करीत आहेत. महापालिकेने रस्त्यांच्या कामासाठी दिलेली मुदत जवळ आली असून अनेक भागांमधील कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे येत्या २० मेपर्यंत पेव्हमेंट क्वालिटी कॉंक्रीट टाकण्याचे काम पूर्ण करण्याचे आव्हान अभियंते व कामगारांसमोर आहे. पेव्हमेंट क्वालिटी कॉंक्रिट टाकल्यानंतर रस्तेबांधणीची अखेरची कामे केली जाणार आहेत. त्यात थर्मोप्लास्ट, कॅट आईज, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, जंक्शन ग्रीड आदींचा समावेश असेल. संबंधित कामे कोणत्याही परिस्थितीत दर्जेदारच झाली पाहिजेत, त्यात ताजडीत करता कामा नये, अशी तंबी अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. कामांची खात्री केल्यानंतर रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत. रस्त्यांची कामे आटोपती घेत असताना पावसाळ्यादरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, याची दक्षता घेण्याचाही सूचना बांगर केल्या आहेत.
दरम्यान, काँक्रीट रस्त्यांलगतचे पदपथ सर्वसामान्य नागरिकांसोबत दिव्यांग व्यक्तींना चालण्यासाठी सुलभ करण्यावर भर देण्यात येणार आहे. पदपथाचा पृष्ठभाग समान आणि अडथळामुक्त करून ते दिव्यांगस्नेही करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पदपथांवर दृष्टिहीन व्यक्तींना मार्गदर्शन करणाऱ्या उभ्या – आडव्या रेषांची फरशी बसविणे आवश्यक असल्याचे मत बांगर यांनी व्यक्त केले असून त्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश देण्यात आले आहेत. काँक्रीटीकरणानंतर उर्वरित रस्त्यांवर मास्टिक टाकण्यासाठी पुरवठादार व कंत्राटदारामधील समन्वयाने मास्टिक कुकरची उपलब्धता करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी रस्त्यांलगतच्या पर्जन्य जलवाहिनीमध्ये प्रत्यक्षात पाणी टाकावे आणि पाणी तुंबणार नाही याची खात्री करावी, असे स्पष्ट आदेश अभिजित बांगर यांनी दिले आहेत.