लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबईकरांना अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याचे समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केले जात असतानाच पालिकेने हे सर्व आरोप मंगळवारी फेटाळून लावले. संबंधित संदेश खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत, असे महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. या अफवांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबईकरांना दररोज ४ हजार दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करताना, जागतिक आरोग्य संघटना आणि आयएस १०५००-२०१२ ने प्रमाणित केलेल्या मानकांनुसारच जलशुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. एकूणच, मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेल्या स्वच्छ पाण्याचाच पुरवठा केला जातो, असा दावा पालिकेने केला आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेत पांजरापूर येथे (१ हजार ३६५ दशलक्ष लीटर प्रतिदिन), भांडुप संकुलात (२ हजार ८१० दशलक्ष लीटर प्रतिदिन), विहार (१०० दशलक्ष लीटर प्रतिदिन) आणि तुळशी (१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन) येथे पाणी शुद्धीकरणासाठी आणले जाते. या पाण्यावर पॉली एल्युमिनियम क्लोराईड (पीएसी), रॅपिड सँड फिल्टर्स, निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर आदी प्रक्रिया केली जाते. त्यानंतर, मुंबईकरांना शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे समाजमाध्यमांवरील खोट्या, दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbaikars supplied with only clean disinfected water claims mumbai municipal administration mumbai print news mrj