मुंबई : विधि पाच वर्ष प्रवेश परीक्षेचा बुधवारी रात्री उशीरा जाहीर झालेल्या निकालामध्ये पटण्यातील एकाच केंद्रावरील चार मुलांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. त्यामुळे या केंद्रांवर गैरप्रकार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने भविष्यात प्रवेश परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी राज्याबाहेर परीक्षा केंद्र न देण्याचा निर्णय घेतला आहे.
विधि पाच वर्ष प्रवेश परीक्षेच्या निकालामध्ये चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी पटणा येथील माही इन्फोटेक या परीक्षा केंद्रावरून परीक्षा दिली होती. त्यात २८ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रामध्ये परीक्षा दिलेले तीन विद्यार्थी तर दुसऱ्या सत्रात परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. त्यामुळे या परीक्षा केंद्रावर काही गैरप्रकार झाला असण्याची शक्यता लक्षात घेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या केंद्राची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात येणार आहे. यापूर्वी नागपूर येथील परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार प्रकरणी दिल्लीतील काही जणांना अटक केल्याची घटना लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी यापुढे कोणत्याही प्रवेश परीक्षेसाठी राज्याबाहेर केंद्र न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी राज्याबाहेर जवळपास नऊ केंद्रे होती.
विधि शाखेच्या पाच वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला ३५ हजार ७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २७ हजार ३७२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. ही २८ एप्रिल रोजी २ सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
बीबीए, बीसीएची आणखी एक सीईटी होणार
राज्यात बीबीए/बीसीए/बीएमएस/ बीबीएम या अभ्यासक्रमाच्या जवळपास १ लाख ८ हजार ७४१ जागा आहेत. या जागांसाठी यंदा घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेसाठी ६१ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. एकूण जागांपैकी अर्ज आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये जवळपास ४८ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता बीबीए/बीसीए/बीएमएस/ बीबीएम या अभ्यासक्रमाची आणखी एक प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार असल्याचेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.