मुंबई : नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे लांबणीवर पडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्यात ४३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यंदा नीट परीक्षेत राज्यातून तब्बल १ लाख ४० हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. प्रवेशाच्या नोंदणीसाठी शुक्रवारी अंतिम दिवस आहे. यंदा नीट परीक्षेत तब्बल १ लाख ४० हजार विद्यार्थी राज्यातून पात्र ठरले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या १० ते ११ हजाराने अधिक आहे.
राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जवळपास २७ हजाराहून अधिक जागा आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत असलेल्या एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी कक्ष) राबवण्यात येते. त्यानुसार सीईटी कक्षाने प्रवेश नोंदणीसाठी १७ ऑगस्टपासून सुरुवात केली. आतापर्यंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विविध शाखांसाठी ४३ हजार ५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. तर अर्ज शुल्क २३ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थांना संकेतस्थळावर मूळ आवश्यक कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागणार असल्याचे सीईटी सेलने म्हटले आहे.
एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस या अभ्यासक्रमांपैकी एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षी चुरस लागते. ऑनलाइन अर्ज नोंदणी न करणाऱ्या विद्यार्थांचा या अभ्यासक्रमांच्या कोणत्याही कोट्यातील प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.
© The Indian Express (P) Ltd