मंगल हनवते, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : बोरिवलीवरून ठाण्याला केवळ २० मिनिटांत पोहोचता यावे, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गाचा (ट्वीन टनेल) खर्च ११,२३५.४३ कोटींवरून १६,६०० कोटींवर गेला आहे. या वाढीव खर्चास प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता जूनपासून भूमिगत मार्गाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा प्रकल्प ‘एमएमआरडीए’कडे वर्ग केला आहे. ‘एमएसआरडीए’च्या आराखडय़ानुसार प्रकल्पाचा खर्च ११,२३५.४३ कोटी रुपये होता. मात्र, आता तो १६,६००.४० कोटी रुपयांवर गेला आहे. खर्चामध्ये पाच हजार कोटी रुपयांनी वाढ झाली असून, यासंबंधीच्या प्रस्तावास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. या प्रस्तावानुसार ‘एमएमआरडीए’ने मूळ आराखडय़ात अनेक बदल केल्यामुळे खर्च वाढला आहे. ‘एमएमआरडीए’च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यानेही त्यास दुजोरा दिला.

‘एमएसआरडीसी’ने केवळ ११.८ किमी लांबीच्या बोगद्याचा आराखडय़ात समावेश करून खर्चाचा ताळेबंद तयार केला होता. पण, ‘एमएमआरडीए’ने प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने अनेक बदल केले. बोगद्याकडे जाणे-येणे सोपे व्हावे, यासाठी ठाण्याच्या दिशेने घोडबंदर रस्त्यावर अंदाजे ७०० मीटरचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. येथेच अंदाजे ५०० मीटरचा भुयारीमार्ग, तसेच बोरिवलीच्या दिशेने ८५० मीटर लांबीचा भुयारीमार्ग बांधण्यात येणार आहे. यामुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.

उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधतानाच बोगद्यात अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, विद्युत यंत्रणा, तसेच ‘ओपन रोड टोलिंग’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच दुहेरी बोगद्यात प्रत्येक ३०० मीटर अंतरावर पादचारी क्रॉस पॅसेज असतील. त्यामुळेही प्रकल्पाचा खर्च वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रकल्पात रचनात्मक बदल करतानाच ‘एमएमआरडीए’ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम वेगाने करण्याच्या दृष्टीनेही विचार केला आहे. आता भुयारीकरणासाठी दोनऐवजी चार टीबीएम (टनेल बोरिंग यंत्र) यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार असून, त्याच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदा ४ एप्रिलला उघडण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करून जूनपासून कामास सुरुवात करण्यात येणार आहे. पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे ‘एमएमआरडीए’चे नियोजन आहे.

पाच वर्षांत प्रकल्पपूर्तीचे नियोजन

बोरिवली-ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत होईल. पहिल्या टप्प्यात बोरिवलीच्या बाजूच्या बोगद्याचे, दुसऱ्या टप्प्यात ठाण्याच्या बाजूच्या बोगद्याचे काम करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात टोल यंत्रणेसह अन्य कामे करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याचे ‘एमएमआरडीए’चे नियोजन आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Project cost for underground road connecting borivali and thane increase by 5000 crore mumbai print news zws