मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई खाली आणण्याचे काम अखेरीस पूर्ण झाले आहे. तुळई खाली आणण्याचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ते खूपच लांबले. डिसेंबरमध्येही तुळई खाली आणल्यानंतर बेअरिंग हटवण्याचे काम २५ डिसेंबर रोजी पूर्ण झाले आहे. यानंतर आता पुढील कामे करण्यात येणार असून रेल्वे हद्दीतील काम पूर्ण करण्यास विलंब झाल्यामुळे कंत्राटदाराला दंड केला जाणार आहे. कंत्राटदाराला ३ कोटींपेक्षा अधिक दंड होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर दुसरी बाजू कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई बसवून तीन महिने झाले तरी ही तुळई खाली आणण्याचे काम पूर्ण झाले नव्हते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही तुळई खाली आणली. मात्र या तुळईचे बेअरींग हटवून तुळई स्थापन करण्यास आणखी पंधरा दिवसांचा कालावधी लागला असून ही कामे आता अखेर २५ डिसेंबरला पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुलाच्या दोन्ही तुळई आता समान पातळीवर आल्या आहेत. रेल्वे हद्दीतील काम पूर्ण करण्यासाठी १५ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. ही मुदत तब्बल दीड महिना पुढे गेली आहे. त्यामुळे कंत्राटदाराला दंड लावणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

हेही वाचा…नव्या वर्षात मराठी चित्रपटांचे सत्ते पे सत्ता…, जानेवारी महिन्यात सात मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

नोव्हेंबर २०२२ पूलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर १५ महिन्यांनी पुलाची एक बाजू सुरू होऊ शकली. यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीला पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या तुळईचे भाग दिल्लीहून मुंबईत आणण्यास सुरुवात झाली होती. दुसऱ्या तुळईचे सुटे भाग येण्यास उशीर झाला. त्यामुळे पालिकेचे नियोजनही कोलमडले होते. दुसरी बाजू सुरू करण्याची मुदतही पुढे ढकलावी लागली होती. त्यानंतर तुळईचे सर्व भाग जोडून ५ सप्टेंबरला ही तुळई रेल्वे मार्गावर बसवण्यात आली. मात्र नोव्हेंबर महिना उजाडला तरी तुळई ८ मीटरपर्यंत खाली आणण्याचे काम सुरू झाले नव्हते. रेल्वेने परवानगी दिल्यानंतर नुकतेच हे काम सुरू झाले असून तुळई पाच मीटरपर्यंत खाली आणण्यात यंत्रणेला यश आले आहे. रेल्वेच्या हद्दीतील कामे करण्यासाठी कंत्राटदाराला नोव्हेंबर महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात हे काम दीड महिना उशीरा झाले आहे. तुळई स्थापन झाल्यानंतर २६ डिसेंबरपासून रेल्वे हद्दीतील भागावरील स्लॅब टाकण्याचे काम केले जाणार आहे. यानंतर आता क्रॅश बॅरिअर, डांबरीकरण, पोहोच रस्त्यांची कामे, पथदिवे, मार्गिकांचे रंगकाम अशी विविध कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. पुलाची दुसरी बाजू सुरू करण्यासाठी एप्रिल २०२५ चे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे.
कंत्राटदाराला किमान तीन कोटीचा दंड

तुळई बसवण्यासाठी सुटे भाग आणण्याकरीता कंत्राटदाराने उशीर केल्याने कंत्राटदाराला पालिका प्रशासनाने नवीन वेळापत्रक दिले होते. मात्र ते वेळापत्रकही पाळणे कंत्राटदाराला जमलेले नाही. त्यामुळे पालिकेने आधीच १५ नोव्हेंबरपर्यंत रेल्वेच्या हद्दीतील कामे पूर्ण न झाल्यास ३ कोटीचा दंड आकारण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ३ कोटींचा दंड कंत्राटदाराला लावण्यात येणार आहेत. त्यापुढे जितके दिवस उशीर झाला तितक्या दिवसांचा हिशोब करून त्याला दंड लावण्यात येईल अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा…‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र

३० एप्रिलचे उद्दीष्ट्य

संपूर्ण पूल सुरू होण्यास ३० एप्रिल २०२५ चे उद्दीष्ट्य ठरवण्यात आले होते. ते अद्याप कायम आहे. पोहोच रस्त्यांची कामे सुरू असून रेल्वेहद्दीतील कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कामे वेळापत्रकानुसार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ३० एप्रिलचे उद्दीष्ट्य गाठण्याचा आमचा प्रयत्न आहे. अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second iron girder of gopal krishna gokhale flyover has been bring down successfully mumbai print news sud 02