तृप्ती देसाई या महाराष्ट्राच्या कन्हैया कुमार असल्याचे विधान मुंबईचे पोलीस उपायुक्त मनोज कुमार शर्मा यांनी केले आहे. हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशाच्या आंदोलनावेळी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेवरून मुंबई पोलीसांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागले होते. यावेळी तृप्ती देसाई यांनी आंदोलनासाठी किंवा मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी कुठलीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती. आम्ही त्यांना हीच गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी हाजी अली येथून मागे फिरावे, असे आम्ही त्यांना वारंवार सांगून पाहिले. मात्र, त्या काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने त्यांना ताब्यात घ्यावे लागले, असे शर्मा यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले. याशिवाय, पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांनीदेखील तृप्ती देसाई यांना हाजी अली येथे फक्त तमाशा करायचा होता, असे सांगितले. आम्ही याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे लक्षात घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता. आम्ही दर्ग्यात जाण्यासाठी त्यांना सहकार्य करायलाही तयार होतो. मात्र, पोलीस दर्ग्यात जाऊ देत नाही असे उलटे आरोप त्या आमच्यावर करू लागल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी निदर्शनासाठी निघाल्या. या सगळ्यामागे त्यांचा हेतू केवळ तमाशा करण्याचा होता, असे भारती यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trupti desai has become maharashtra kanhaiya kumar says mumbai police