रसिका मुळय़े

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना साथीच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षणाचा आणि प्रयोगांचा गाजावाजा झालेल्या खासगी शाळांपेक्षा प्रत्यक्ष शासकीय शाळांबाबत जनमानसात विश्वास वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. करोना काळात राज्यातील शासकीय शाळांमधील पट जवळपास दोन लाखांनी वाढल्याचे केंद्रीय शिक्षण विभागाच्या अहवालातील आकडेवारी सांगते. औपचारिक शिक्षण प्रवाहातील एकूण विद्यार्थी करोना काळात घटले असून याचा सर्वाधिक फटका खासगी शाळांना बसला आहे.

करोना साथीपूर्वी म्हणजे २०१९-२० या शैक्षणिक वर्षांत शासकीय शाळांमध्ये ५६ लाख ४६ हजार ३१९ विद्यार्थीपट होता. करोना साथीच्या काळात म्हणजे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत शासकीय शाळांचा पट घसरला. मात्र, शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर शासकीय शाळांत प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला. करोनाकाळात एकूण विद्यार्थीसंख्या घटली असताना शासकीय शाळांमधील विद्यार्थीसंख्या मात्र वाढली. करोनाची साथ ओसरल्यावर शाळांचा पट दोन लाखांपेक्षा अधिक वाढला आहे. शासकीय शाळा आणि शिक्षण विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे हे घडले. ग्रामीण भागातील शालेय शिक्षणाचा कणा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा करोना साथीच्या काळात पुरत्या हडबडल्या. खासगी संस्थांच्या तुलनेत आर्थिक सुबत्ता कमी असणाऱ्या या शाळांकडे आणि तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडेही ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक साधनांचा अभाव होता. मात्र, हळूहळू या परिस्थितीतून सावरून शासकीय शाळांनी, शिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले. त्यांना यश मिळाले.

गैरसोयी कायमच..
करोना काळात संगणक, इंटरनेट यांची शाळांमधील उपलब्धता हा महत्त्वाचा घटक ठरला. मात्र, विद्यार्थीसंख्या वाढत असली तरी शासकीय शाळांमधील सुविधांचा विकास मात्र फारसा झाल्याचे दिसत नाही. संगणक आणि इंटरनेटच्या उपलब्धतेचा विचार करता अवघ्या ६८ टक्के शाळांमध्ये संगणक आहेत, तर इंटरनेट २८ टक्के शाळांमध्ये आहे. खासगी शाळांमध्ये हेच प्रमाण ९६.८ टक्के आणि ८५.९ टक्के आहे. अनुदानित शाळांमध्ये ९२.५ टक्के, तर विनाअनुदानित शाळांमध्ये ७०.७ टक्के असे प्रमाण आहे.

अनुदानित शाळांची पटघसरण
करोना काळात खासगी शाळांबरोबरच अनुदानित शाळांमधील पटही घसरला. शैक्षणिक वर्ष २०१९ -२० मध्ये एक कोटी पाच लाख ८८ हजार ७६० विद्यार्थी अनुदानित शाळांमध्ये होते. गेल्यावर्षी म्हणजे २०२१-२२ या वर्षांत एक कोटी दोन लाख ३८ हजार ९२९ इतकी अनुदानित शाळांची पटसंख्या झाली.

दोन वर्षांत ६२४ शाळा बंद
’राज्यात दोन वर्षांत ६२४ शाळा बंद, त्यापैकी २४७ शाळा शासकीय.
’२०१९-२० या वर्षांत एक लाख १० हजार २२९ शाळा होत्या. त्यातील ६५ हजार ८८६ शासकीय होत्या.
’२०२१-२२ या वर्षांत एक लाख नऊ हजार ६०५ शाळांची नोंद झाली. त्यातील ६५ हजार ६३९ शासकीय.

संख्याचित्र वर्ष विद्यार्थी
२०१९-२० ५६ लाख ४६ हजार ३१९
२०२०-२१ ५५ लाख ९४ हजार ७२६
२०२१-२२ ५८ लाख ५३ हजार ०९४

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two lakh students admitted to government schools during corona period amy