शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेडसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. तसेच नांदेडमध्ये रुग्णांच्या मृत्यूनंतर डीनला संडास साफ करायला लावल्याच्या घटनेवरून शिंदे गटाच्या खासदारावर शाब्दिक हल्ला चढवला. ते शुक्रवारी (६ ऑक्टोबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “एका मस्तवाल गद्दार खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले. ते डीन आदिवासी आहेत असं ते म्हणतात. मी कधीच जातपात पाहिली नाही. मी सर्वांना एकाच न्यायाने वागवलं आहे. मात्र, डीनला संडास साफ करायला लावल्यानंतर त्या गद्दारावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून डीनला धमकावण्यासाठी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का?”

“मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांचा खर्च करणार का?”

“राज्यभर औषधांचा तुटवडा आहे. मंत्री म्हणतात औषधे मुबलक आहेत, पण प्रत्यक्षात खडखडाट आहे. या बातम्या माध्यमांनीच दिल्या आहेत. मग हे मंत्री नेमके कोण आहेत. आरोग्य खातं विभागलं गेलं आहे. मात्र, औषधं मुबलक प्रमाणात आहेत असा दावा करणारे मंत्री कोणीही असले, तरी चंद्रपूरची एक महिला सांगत आहे की, बाहेरून औषधं आणण्यासाठी आम्हाला लिहून दिलं जातं. मग पंतप्रधानांच्या योजना, महाराष्ट्र सरकारच्या योजना, मुख्यमंत्री सहायता निधी यातून या रुग्णांचा खर्च केला जाणार आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

“मुख्यमंत्री सहायता निधीची चौकशी झाली पाहिजे”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री सहायता निधीतील मदत नेमकी कुणाला जाते याची चौकशी झाली पाहिजे. ती बिलं खरी आहेत की नाही हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. मात्र, आज औषधं कुठेही नाहीत. करोना काळात कुठेही औषधांचा तुटवडा नव्हता. आज दुसरी कोणतीही साथ नाही. आज केवळ भ्रष्टाचाराची साथ आहे. आरोग्य खात्यातील नेमणुकांसाठी रेट कार्ड ठरवल्याचं माझ्या कानावर येत आहे.”

हेही वाचा : अन्वयार्थ: मस्तवाल लोकप्रतिनिधी

“औषधं खरेदीतील दलालांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे”

“निविदा प्रक्रिया बंद होणार असेल आणि विना निवादा औषध खरेदी करणार असतील, तर याचा अर्थ सरकार सरळसरळ भ्रष्टाचाराला दार उघडं करून देत आहे. आज जिकडे औषधं पोहचलेली नाहीत तिकडे कुणाचे दलाल बसले आहेत का याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. कारण युतीचं सरकार होतं तेव्हा धरण खेकड्यांमुळे फुटलं होतं. अशा धरण फोडणाऱ्या आणि आपल्या शेतात पाणी वळवणाऱ्या खेकड्यांच्या हातात कारभार गेला आहे का?”, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारत टोला लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray comment on toilet cleaning incident in nanded pbs