एकनाथ शिंदेंसह पक्षातील आमदारांनी बंड पुकारल्याने बहुमत गमावलेल्या उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरं जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार बुधवारी रात्री कोसळलं. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील शक्तिपरीक्षा मात्र टळली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकारने बहुमत गमावल्याच्या भाजपाच्या पत्रानुसार राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते. या बहुमत चाचणीस शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. रात्री नऊच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर थोडय़ाच वेळात ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आणि राजीनामा सादर करण्यासाठी राजभवन गाठलं.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताच फडणवीसांनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार, म्हणाले “त्यांनी हिंमत…”

CM Uddhav Thackeray Resign: उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची शरद पवारांना माहितीच नव्हती?

दरम्यान उद्धव ठाकरे राज्यपालांकडे राजीनामा सोपवत असताना तिथे उपस्थित शिवसैनिकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात येत होत्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना हात दाखवत शांत राहण्यास सांगितलं.

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंचा राजीनामा स्वीकारला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितलं आहे.

समारोपाच्या भाषणात उद्धव ठाकरेंचा राज्यपालांना टोला

‘‘गुरुवारी तातडीने बहुमत चाचणी घ्यावी, असा निकाल न्यायदेवतेने दिला आह़े त्याआधी विरोधी पक्षनेत्यांनी सरकारकडे बहुमत नसल्याचे निवेदन देताच राज्यपालांनी २४ तासांत लोकशाहीचे पालन केले. पण, १२ जणांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबाबत त्यांनी गेल्या दीड वर्षांत निर्णय घेतलेला नाही,’’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना समारोपाच्या भाषणात लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray resgination shivsena activist slogans governor bhagat singh koshyari sgy