मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असून सध्या या धरणांत मिळून ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरणार नसल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी नवीन धरण गेल्या दहा वर्षांत बांधलेले नाही. तर गारगाई धरण, समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याचा प्रकल्प कागदावरच असून पुढील किमान पाच-सहा वर्षे मुंबईला उन्हाळ्यात पाणीकपातीला सामोरे जावे लागू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणांतील पाणीसाठा ३३.५७ टक्क्यांवर आला आहे. वातावरणातील उष्मा वाढू लागला असून हा पाणीसाठा जुलैअखेरीपर्यंत पुरवावा लागणार आहे. मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली आहे. ऊर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी नोंदवली आहे. पाऊस लांबल्यास मुंबई महापालिकेला या राखीव साठ्याचा वापर करावा लागणार आहे.

सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर आहे. त्या तुलनेत सध्या सात धरणांत मिळून ५ लाख ६६ हजार ५९९ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा जास्त असला तरी जुलैअखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आतापासूनच पाण्याचा दाब कमी आहे. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागांत पाणीटंचाई भेडसावते आहे.

प्रकल्प कागदावरच

मुंबईची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत झपाट्याने वाढली आहे. मात्र त्या तुलनेत पाणीसाठा वाढलेला नाही. मध्य वैतरणा धरण २०१४ मध्ये बांधून पूर्ण झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांत एकही नवीन धरण मुंबई महापालिकेने बांधलेले नाही. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकाने काही वर्षांपूर्वी नेमलेल्या डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मुंबई पालिकेने गारगाई, पिंजाळ व दमणगंगा असे तीन प्रकल्प हाती घेतले होते. गारगाई धरण प्रकल्पासाठी पाच लाख झाडे कापावी लागणार असल्यामुळे ठाकरे सरकारच्या काळात मुंबई महापालिकेने हा प्रकल्प बाजूला ठेवला होता, तर समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवणारा नि:क्षारीकरण प्रकल्पही निविदेच्या पातळीवरच आहे.

गेल्या दहा वर्षांत मुंबईची लोकसंख्या किमान २० टक्के वाढली आहे. तसेच नोकरीनिमित्त मुंबईत येणारी लोकसंख्याही वाढली आहे, मात्र पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे नवीन प्रकल्प हाती घेण्याची आवश्यकता आहे. तसेच पाणीगळतीचे प्रमाणही कमी करण्याची गरज आहे. – अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water storage has decreased the project is only on paper only 33 percent storage in all seven dams for mumbai mumbai print news ssb