मुंबई : महिला हिंसाचारप्रकरणी गुन्ह्याची निर्गती ६० दिवसांत करण्याचा नियम आहे. असे असताना मयुरी हगवणे यांना कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणप्रकरणी गुन्ह्याचे दोषरोपपत्र वेळेत दाखल न केल्याप्रकरणी चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी केली.
मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेस सासरच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण राज्यात सध्या चर्चेत आहे. वैष्णवीची मोठी जाव मयुरी हिने सासरे, सासू, दीर आणि नणंद यांच्यावर मारहाणीची आरोप करत पौंड पोलीस स्टेशनमध्ये ६ नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्ह्याचा तपास न करता सदर गुन्हा दोन महिन्यांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी बावधन पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला.
परिणामी हगवणे कुटुंबीयांवर ६० दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल होऊ शकले नव्हते. मयुरीने नोंदवलेल्या गुन्ह्यांचे वेळेत आरोपपत्र दाखल केले असते तर वैष्णवीचा बळी गेला नसता, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मयुरीच्या आईने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. आयोगाने त्याच दिवशी पोलीसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. हगवणे कुटुंबियावर मयुरीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आरोपपत्रास विलंब केल्याप्रकरणाची गृहविभागाने चौकशी करावी, म्हणजे नेमके सत्य समोर येईल, असे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.