चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील शेतात धान कापणी करीत असताना वाघाने हल्ला करून शेतमजूर महिलेस गंभीर जखमी केले. जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. संगीता संजय खंडरे (४५), असे मृत महिलेचे नाव आहे. हेही वाचा- छत्तीसगड सीमाभाग आणि गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला हादरे; अकरा महिन्यात १३२ नक्षल्यांचा मृत्यू सावरगाव येथील संगीता खंडरे या गोवारी समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष बाजीराव कोहरे यांच्या शेतात धान कापणीच्या कामावर गेल्या होत्या. धान कापणी करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. वाघाने त्यांना ५० फुटापर्यंत फरफटत नेले. तेथे उपस्थित महिलांनी आरडाओरड केल्याने वाघाने महिलेला सोडून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात रोष व्यक्त होत आहे. वनविभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.