MSBSHSE Maharashtra SSC 10th Board Result Passing Percentage महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९५.५८ टक्के लागला आहे. नऊ विभागीय मंडळांमध्ये गेल्या वर्षी ९३.२२ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात सहाव्‍या स्थानी होता यावेळी क्रमवारीत पाचव्‍या स्थानी सुधारणा झाली आहे.

अमरावती विभागातून एकूण १ लाख ६१ हजार ४९ विद्यार्थ्‍यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्‍यक्ष परीक्षेला १ लाख ५९ हजार ६८४ विद्यार्थी प्रविष्‍ट झाले. त्‍यापैकी १ लाख ५२ हजार ६३१ विद्यार्थी हे उत्‍तीर्ण झाले. अमरावती विभागाची उत्‍तीर्णतेची टक्‍केवारी ही ९५.५८ आहे.

हेही वाचा : चिंताजनक : ४ महिन्यांत १८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; मृत्यूनंतरही कुटुंबीयांचा मदतीसाठी संघर्ष

प्रावीण्यासह प्रथम श्रेणी मिळवणारे विद्यार्थी किती?

अमरावती विभागात उत्‍तीर्ण झालेल्‍या परीक्षार्थ्‍यांपैकी प्रावीण्‍यासह प्रथम श्रेणी म्‍हणजे ७५ टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्‍यांची संख्‍या ६० हजार २२५ इतकी आहे. प्रथम श्रेणी म्‍हणजे ६० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ५२ हजार ९७६, द्वितीय श्रेणी म्‍हणजे ४५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ३२ हजार १०२ तर काठावर ३५ टक्‍क्‍यांहून पुढे गुण मिळवणा-या विद्यार्थ्‍यांची संख्‍या ही ७ हजार ३२८ इतकी आहे. विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च दरम्यान घेण्यात आली़ परीक्षेमध्ये प्रथमच प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत श्रेणी इ. परीक्षांचे गुण ओएमआर शीट ऐवजी पोर्टल वर ऑनलाईन पध्दतीने भरून घेण्यात आले.

हेही वाचा : नागपूर : कारवाईऐवजी तडजोडीवर भर! पाच महिन्यांत फक्त ७०६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त व जिल्‍हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधित यंत्रणांच्या मदतीने ‘गैरमार्गविरूध्द लढा’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने भरारी पथके नेमण्यात आलेली होती. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत होती. तसेच विशेष महिला भरारी पथक स्थापन करण्यात आलेली होती. गतवर्षीप्रमाणेच मार्च २०२४ परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली होती.

हेही वाचा : डबल डेकर उड्डाणपुलामुळे कोंडी, नागपूरकर त्रस्त, विमानतळ चौकात…

सवलतीचे गुण कोणाला?

दिव्‍यांग विद्यार्थ्‍यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्‍यात आले आहेत. याशिवास पात्र खेळाडू विद्यार्थ्‍यांना देखील सवलतीचे वाढीव गुण देण्‍यात आले आहेत. परीक्षेत उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांना त्‍यांची संपादणूक सुधारण्‍यासाठी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत फक्‍त लगतच्‍या दोन परीक्षांमध्‍ये पुन्‍हा प्रविष्‍ट होता येईल. सर्व सहा अनिवार्य विषयांसह प्रविष्‍ट होऊन उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांचे सहा अनिवार्य विषयांचे विषयनिहाय गुण दर्शवून त्‍यापैकी ज्‍या पाच विषयांची टक्‍केवारी अधिक असेज, त्‍या पाच विषयांचे एकुणात गुण (५०० पैकी) व टक्‍केवारी गुणपत्रिकेत दर्शविण्‍यात आली आहे. मात्र उत्‍तीर्णतेचे निकष व अन्‍य सवलती प्रचलित पद्धतीप्रमाणे ठेवण्‍यात आल्‍या आहेत.