चंद्रपूर : राज्य शासनाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे १३ नागरिकांचा मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे. या सोहळ्याला देशाचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री उपस्थित असल्याने न्याय कुणाकडे मागायचा असाही प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री व भाजप सरकारमधील मंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात जाऊ, असा इशारा राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईतील खारघर येथे राज्य शासनाच्या वतीने रविवारी १६ एप्रिलला आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी १३ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील कस्तुरबा चौकात गुरुवारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार बाळू धानोरकर बोलत होते. धानोरकर म्हणाले की, कार्यक्रम सकाळी १०.३० वाजताचा निर्धारित केला होता. परंतु, मंचावर उपस्थित नेत्यांनी भाषणबाजीत वेळ घालवल्याने कार्यक्रम काही तास लांबला. कार्यक्रमाला उपस्थित लाखो नागरिकांना तब्बल सहा ते सात तास उन्हात रहावे लागले.

हेही वाचा >>>नागपूर : जगातील सर्वात लहान चरखा, लांबी ३.२० मिमीची, सूतही काढता येतं

त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. यातील १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकाराला राज्य शासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. या कार्यक्रमाचे आयोजक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री व भाजपमधील मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयीन लढा लढू असेही धानोरकर म्हणाले.यावेळी शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balu dhanorkar opinion that the state government is responsible for the death in the maharashtra bhushan program rsj 74 amy