गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतीने गावातील कुटुंबातील कुणाच्या घरी कुणी मरण पावला तर सांत्वन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत गावातील कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ग्रामपंचायती मार्फत त्या कुटुंबाला अंत्यसंस्कारासाठी तत्काळ आर्थिक मदत व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २८ मे रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमताने या संबंधीचा ठराव पारित केला. सालेकसा तालुक्यातील भजेपार ही ग्रामपंचायत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखली जाते. येथील ग्रामस्थांच्या एकीच्या बळावर या ग्रामपंचायतीने १ कोटी ३ लाख ६० हजार रुपयांची पारितोषिके आतापर्यंत पटकावली आहेत. नवोपक्रमाच्या आदर्श श्रृंखलेत भजेपार ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा या सांत्चन योजनेच्या माध्यमातून एक नवा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. या सांत्वन योजनेतून ही ग्रामपंचायत दुखातून सावरण्यासाठी गावातील कुटुंबांना आर्थिक व भावनिक आधार देणार आहे. ही योजना केवळ
आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला मानसिक, भावनिक आणि सामाजिक आधार देणारी ठरणार आहे.सरपंच चंद्रकुमार बहेकार यांनी हा प्रस्ताव मांडला असता तो ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. गावाच्या विकासाइतकंच,
गावकऱ्यांच्या दुखात सामील होणे हेही खरे नेतृत्व असते, हे भजेपारने या निर्णयातून दाखवून दिल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. ग्रामसभेला ग्रामपंचायत अधिकारी सुनील शिवणकर, ग्रामपंचायत सदस्य रवीशंकर बहेकार, रेवतचंद बहेकार, राजेश बहेकार, मनीषा चुटे, सरस्वता भलावी, आशा शेंडे, आत्माराम मेंढे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष जगेश्वर तरोणे आणि गावकरी उपस्थित होते.
सांत्वन योजनेत अशा प्रकारे मिळतील सुविधा
अंत्यसंस्काराच्या खर्चासाठी तत्काळ २ हजार रुपयांची रोख मदत,
३०० शोक संदेश पत्रे मोफत प्रिंटिंग
५ कॅन आरओचे शुद्ध पिण्याचे पाणी अंत्यसंस्कारासाठी मोफत.
स्मशानभूमीपर्यंत शव नेण्यासाठी स्टीलची तिरडी (शववाहिनी) निःशुल्क उपलब्ध.
तेरवीला आरओचे शुद्ध पाणी १० कॅन मोफत.
मृतकाच्या स्मृतिनिमित्त उद्यानात झाड लावण्यासाठी देशी प्रजातीचे रोपटे उपलब्ध
तत्काळ मृत्यूची नोंद आणि दाखला मिळणार.
गाव हे ग्रामपंचायतीचे कुटुंब असून, येथील प्रत्येक नागरिक या कुटुंबाचा अविभाज्य घटक आहे. सुखासह दुःखातही आपण एकमेकांच्या कामी येणे हाच खरा मानवधर्म आहे. एखाद्या कुटुंबात मृत्यू झाल्यास त्याचे दुख आपण कमी करू शकत नाही. परंतु, मानसिक आधार देऊन मायेची फुंकर मात्र नक्कीच घालता येते. ग्रामविकासासाठी झटणाऱ्या मायबाप ग्रामस्थांचे ऋण फेडण्यासाठी सांत्वन योजना ही नक्कीच आधार ठरणार आहे.-चंद्रकुमार बहेकर, सरपंच,ग्रामपंचायत भजेपारजि. गोंदिया