बुलढाणा : इयत्ता दहावी, बारावीच्या निकालात अमरावती विभागात आघाडीवर राहण्याची दिमाखदार परंपरा बुलढाणा जिल्ह्याने कायम राखली आहे. आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात प्रथम आला आहे. बुलढाणा जिल्ह्याने ९५.५२ टक्के निकालासह अमरावती विभागात अव्वल स्थान पटकावले आहे.
इयत्ता बारावीच्या निकालात अल्प फरकाने बुलढाणा जिल्हा विभागात दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. ते शल्य दहावीच्या निकालात भरून काढत जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. आज मंगळवारी, १३ मे रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील ३९ हजारावर विदयार्थी, पालक शिक्षक आणि शैक्षणिक संस्थाना सुरुवातीला किमान एक तास निकाल बघण्यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.
जिल्ह्यातील ३८ हजार ९९६ पैकी तब्बल ३७, २५२ विध्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचे शैक्षणिक वर्तुळ आनंदाने न्हाऊन निघाले आहे. जिल्ह्याचा निकाल ९६ टक्केच्या घरात पोहोचला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ३९५०९ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ३८९९६ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३७२५२ विदयार्थी उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १५९ परीक्षा केंद्रावरून विध्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
यंदा बारावी प्रमाणेच दहावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर म्हणजे २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान घेण्यात आली होती.दरम्यान, मुलीनी मुलांना निकालात मागे टाकणे ही नित्याचीच बाब ठरली आहे. यंदाही ही परंपरा कायम आहे. मुलींची टक्केवारी ९६.९७ इतकी असून त्या तुलनेत मुलांची टक्केवारी ९४. ७४ इतकी आहे.
बारावीत दुसरा बारावीत बुलढाणा जिल्हा ९५. १६ टक्केसह विभागात दुसरा ठरला होता. वाशीम जिल्ह्याने ९५. ६६ टक्केसह प्रथम स्थान मिळविले होते. किंचित फरकाने बुलढाणा दुसऱ्या स्थानावर घसरला होता. मात्र दहावीच्या निकालात जिल्ह्याने अव्वल स्थान पटकवूनजिल्हा वासीयांची खंत दूर केली.