चंद्रपूर : न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही शेतजमिनीच्या फेरफाराचा निर्णय न घेता तहसील कार्यालय प्रशासनाकडून होत असलेल्या टाळाटाळीला कंटाळून एका शेतकऱ्याने थेट तहसील कार्यालयातच विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना आज.शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकारामुळे महसूल विभागासह संपूर्ण प्रशासनात एकच खळबळ उडाली असून पीडिताची प्रकृती गंभीर आहे. त्याला तात्काळ चंद्रपूर जिल्हा रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव परमेश ईश्वर मेश्राम (वय ५५) असे असून तो मूळचा मोरवा येथील रहिवासी आहे.

मेश्राम यांची कुरोडा गावातील सर्वे क्रमांक ८७ वरील शेती ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. मेश्राम यांचे वडील जिवंत असताना त्यांनी वरील शेतजमीन विधिवत विक्री करून मुलगा परमेश यांच्या नावावर केली होती. मात्र, नंतर इतर बहिण -भावांनी या जमिनीबाबत आक्षेप घेत न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून शेवटी परमेश मेश्राम यांच्या बाजूने निकाल दिला आणि जमीन त्यांच्याच नावे असल्याचे स्पष्ट केले.

या आदेशानंतर मेश्राम यांनी तहसील कार्यालयात फेरफारासाठी अर्ज दाखल केला. मात्र, अनेक महिने उलटूनही महसूल विभागाने कोणताही निर्णय घेतला नाही. उलट, विविध कारणांनी प्रकरणावर निर्णय घेणे टाळले जात असल्याचे दिसून आले. सध्या सुरु असलेल्या “महसूल पंधरवडा” मोहिमेत अनेक प्रकरणे निकाली काढली जात आहेत. मेश्राम यांनीदेखील आपले प्रकरण या कालावधीत सोडवले जाईल अशी अपेक्षा ठेवली होती. मात्र, वारंवार तहसील कार्यालयात चकरा मारूनही त्यांना केवळ निराशाच हाती लागली.

सायंकाळी टोकाचा निर्णय

शेवटी शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता, परमेश मेश्राम यांनी थेट तहसील कार्यालयातच विष प्राशन केले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात हलविले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या संपूर्ण घटनेबाबत तहसीलदार राजेश भांडारकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

विशेष म्हणजे महसूल विभागाचा पंधरवडा सध्या सुरू असून महसूलाशी संबंधित तक्रारींवर निर्णय घेणे हीच मोहिमेची उद्दिष्ट्ये आहेत. अशा वेळीही एका न्यायालयीन आदेशानंतरच्या फेरफार प्रकरणाकडे दुर्लक्ष करून एका शेतकऱ्याला विष प्राशन करण्यास प्रवृत्त करणारी ही घटना महसूल विभागाच्या निष्क्रीयतेचे आणि उदासीनतेचे मोठे उदाहरण ठरली आहे. स्थानिक शेतकरी संघटना आणि नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत तहसील प्रशासना विरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसेच, पीडित शेतकऱ्याच्या प्रकरणाचा तातडीने निकाल लावून त्याला न्याय द्यावा, अशीही मागणी होत आहे.